Lok Sabha Election 2024: गजानन किर्तीकर म्हणाले, अमोल जिंकला तर …

माझ्या पत्नीने तिचे मत मांडले. ती म्हणाली ते खरे आहे, असे ते म्हणाले.

202
Lok Sabha Election 2024: गजानन किर्तीकर म्हणाले, अमोल जिंकला तर ...

लोकसभेचं पाचव्या टप्प्यातलं मतदान नुकतच पार पडलं. याबाबत राजकीय विश्लेषक, नेते मंडळींमध्ये कोण जिंकणार? कोण हरणार? अशी मतमतांतरं सुरू आहेत. दरम्यान खासदार गजानान कीर्तिकर यांनीही आपल्या मुलाविषयी भावना व्यक्त केली आहे. (Lok Sabha Election 2024)

वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील सत्ताधारी महायुतीचे शिवसेना उमेदवार रवींद्र वायकर जिंकले काय अन् हरले काय त्यात माझा काय दोष? मतदारांनी जे ठरवले ते होईल; पण तिथे अमोल जिंकला, तर वडील म्हणून मला निश्चितच आनंद होईल, अशी भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी बुधवारी व्यक्त केली. या मतदारसंघात वायकर यांचा सामना ठाकरे गटाच्या अमोल कीर्तिकरांशी होणार आहे. (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा – Pune Car Accident: विशाल अग्रवालवर शाई फेकण्याचा प्रयत्न; वंदे मातरम् संघटना आक्रमक )

शिवसेनेचे उपनेते शिशिर शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका पत्राद्वारे गजानन कीर्तिकर यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. त्यांनी कीर्तिकरांवर उद्धव ठाकरे गटाची बाजू घेतल्याचा आरोप केला आहे. या पार्श्वभूमीवर गजानन कीर्तिकर यांनी आपली बाजू स्पष्ट केली आहे. (Lok Sabha Election 2024)

आपली बाजू मांडताना गजानन कीर्तिकर म्हणाले की, वायव्य मुंबई मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार रवींद्र वायकर यांच्या प्रचाराच्या पूर्वतयारीसाठी जेवढ्या सभा झाल्या त्या सर्वांना मी उपस्थित होतो. मी कोल्हापूर व नाशिकमध्येही जाऊन प्रचार केला. त्यानंतरही काही गोष्टींचा विपर्यास करण्यात आला. त्याचा मला त्रास झाला, असा प्रसंग कुणाच्याही आयुष्यात येऊ नये. माझ्या पत्नीने तिचे मत मांडले. ती म्हणाली ते खरे आहे, असे ते म्हणाले.

शिशिर शिंदे संवेदनशील शिवसैनिक
एकनाथ शिंदे शिवसेनेचे विचार पुढे घेऊन जात आहेत. आमचा पक्ष कुठेतरी भरकटत होता. त्यामुळे मी त्यांच्यासोबत गेलो. त्यांच्या मागे शिवसेनेचे बळ उभे राहील. मी आयुष्यभर त्यांची साथ देईन, असेही गजानन कीर्तिकर यावेळी म्हणाले. शिशिर शिंदेंनी माझ्या हकालपट्टीचे पत्र लिहिले आहे. त्यांनी त्यांची भावना मांडली आहे. तो एक ध्येयवादी शिवसैनिक आहे. तसाच तो संवेदनशीलही आहे. मी आमच्या उमेदवारासाठी सर्वकाही केले, असा दावाही त्यांनी यावेळी केला.

एकनाथ शिंदे भवितव्य घडवणारा नेता
गजानन कीर्तिकर यांनी यावेळी निवडणुकीत अमोल कीर्तिकर यांचा विजय झाला तर वडील म्हणून आपल्याला आनंदच होईल असाही दावा यावेळी केला. ते म्हणाले की, माझ्या कार्यकाळात आम्ही कामांची विभागणी केली होती. मला सर्वकाही बघण्यास वेळ मिळत नव्हता. अमोल गेल्या ९ वर्षांपासून सर्वकाही पाहत होता. माझ्या कुटुंबीयांची भावना होती की, मी शिंदेंसोबत जाऊ नये; पण एकनाथ शिंदे हा भवितव्य घडवणारा नेता असल्यामुळे मी त्यांच्यासोबत गेलो. मी आताही त्यांची भेट घेईन. राहिला प्रश्न वायव्य मुंबईत कोण जिंकेल याचा, तर रवींद्र वायकर हरला काय आणि जिंकला काय ? यात माझा काय दोष. मतदारांनी जे ठरवले तेच होईल. पण अमोल जिंकला तर मला वडील म्हणून निश्चितच आनंद होईल, असेही गजानन कीर्तिकर यावेळी बोलताना म्हणाले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.