काँग्रेसमध्ये नाराजांची फौज वाढता वाढे…२३ ‘ते’ केंद्रातील २५ ‘हे’ राज्यातील

103

सध्या काँग्रेसमध्ये नाराजांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. काँग्रेसच्या केंद्रीय पातळीवरील नेतृत्वावर नाराजी व्यक्त करून देशपातळीवर २३ नाराजांचा स्वतंत्र गट याआधीच तयार झाला आहे. काँग्रेसमधील नाराजांची ही फौज खालपर्यंत वाढत आहे. आता महाराष्ट्रातीलही २५ नाराज आमदारांनी राज्यातील नेतृत्वाच्या विरोधात असंतोष व्यक्त केला आहे. कारण महाविकास आघाडीत सहभागी असूनही काँग्रेसला सापत्न वागणूक मिळत असल्याचा आरोप हे नाराज आमदार करत आहेत. यावर काँग्रेसचे राज्यातील नेतृत्व फारसे कणखर भूमिका घेताना दिसत नाही. त्यामुळे या नाराजांनी थेट काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेण्याचे ठरवले आहे.

सोनिया गांधींकडे करणार तक्रार

अर्थसंकल्पातील निधी वाटपात राष्ट्रवादीने भेदभाव केला म्हणून महाविकास आघाडीत शिवसेनेच्या आमदारांनी उघड नाराजी व्यक्त केली. आता त्या पाठोपाठ काँग्रेसच्या नाराज आमदारांचा असंतोष उफाळून आला आहे. काँग्रेसचे २५ आमदार नाराज आहेत. त्यांनी थेट सोनिया गांधी यांच्याकडे तक्रार करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी या आमदारांनी सोनिया गांधी यांच्या भेटीची वेळ मागितली आहे. महामंडळ आणि दंडाधिकारी यांच्या नियुक्त्या रखडल्या आहेत, जिल्हा समित्या बनवल्या नाहीत, त्यामुळे अडीच वर्षे वाया गेल्याची भावना आमदारांमध्ये आहे. या पार्श्वभूमीवर या आमदारांनी सोनिया गांधींकडे तक्रार करायचे ठरवले आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे सर्व काँग्रेस आमदारांची नाराजी ही काँग्रेसच्या राज्यातील नेतृत्व आणि मंत्र्यांविरोधात आहे. नाराज काँग्रेस आमदारांचा आकडा हा २५ पर्यंत गेली आहे. येत्या तीन तारखेला एका विशेष ट्रेनिंगसाठी ही सर्व मंडळी दिल्लीला पोहोचणार आहेत. त्यामुळे तिथे त्यांनी सोनिया आणि राहुल गांधी यांना भेटायची वेळ मागितली असल्याची माहिती आहे.

(हेही वाचा सज्ज झाले १२ शिलेदार; पुन्हा आणणार भाजप सरकार!)

‘हे’ आमदार बनणार डोकेदुखी

विशेष म्हणजे काँग्रेसचे हायकमांड असलेल्या गांधी घराण्याच्या नेतृत्वावर अर्थात सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्याविरोधात देशपातळीवर काँग्रेसचे २३ नेते याआधीच एकवटले आहेत. त्यांनी जी-२३ या नावाचा गट स्थापन केला आहे. काँग्रेसमध्ये केंद्रीय पातळीवर नाराजी व्यक्त करणाऱ्या जी-२३ नंतर महाराष्ट्रात जी-२५ बनण्याची शक्यता आहे, जो राज्यातील काँग्रेस नेतृत्वासाठी डोकेदुखी ठरू शकतो. हे नाराज आमदार राज्यातील महाविकास आघाडी सरकारची तक्रार सोनिया गांधी यांच्याकडे करणार आहेत. तर सरकारमध्ये राहण्यास उत्सुक असलेले काँग्रेसचे नेते मात्र यामुळे नाखूष आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.