सरकार बरखास्त होणे, शिवसेनेच्या फायद्याचंच!

77

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देत महाराष्ट्र विकास आघाडी सरकार बरखास्त केले. उध्दव ठाकरे यांनी राजीनामा दिल्याने शिवसैनिकांकडून तसेच हिंतचिंतकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. परंतु राज्यातील महाविकास आघाडी बरखास्त केल्यामुळे ते शिवसेनेच्या पथ्यावर पडले असून आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षात नवचैतन्य आणण्यासाठी उध्दव ठाकरे हे मोकळे झाले आहेत.

… आणि शिवसेनेचे वाईट दिवस आले

महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेनेचे ३९ आमदार फुटल्यानंतर हे सरकार अल्पमतात आल्यानंतर बहुमत चाचणीला सामोरे जाण्यापूर्वीच उध्दव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा बुधवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सादर केला. त्यानंतर शिवसैनिकांकडून तसेच काही हितचिंतकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. परंतु सरकार बरखास्त झाल्यामुळे उध्दव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेचे वाईट दिवस आले असल्याचे बोलले जात आहे.

उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना केले भावनिक आवाहन 

परंतु सरकार बरखास्त होणे हे शिवसेनेच्या पथ्यावर पडल्याचे बोलले जात आहे. मागील अडीच वर्षांपासून शिवसेना पक्षप्रमुख व तत्कालिन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि युवा सेना अध्यक्ष, शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचे पक्ष संघटनेच्या बांधणीकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले होते. परंतु आता सरकार बरखास्त झाल्याने ठाकरे यांना पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी अधिक वेळ देता येणार आहे. मुख्यमंत्री पदी असताना शेवटच्या फेसबुक लाईव्ह वरून जनतेशी संवाद साधताना त्यांनी आपण मुख्यमंत्री आणि विधान परिषद सदस्यत्वचा राजीनामा देत असलो तरीही मी शिवसेना भवनात आपल्या सर्वांना भेटण्यासाठी बसत जाईन असे भावनिक आवाहन शिवसैनिकांना केले होते.

(हेही वाचा – राज ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिले ‘हे’ २ महत्त्वाचे सल्ले)

राजकीय जाणकारांना काय वाटते?

त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यासह गेलेल्या 39 आमदारांच्या बंडानंतर तसेच इतर पदाधिकारी शिवसैनिक हे फुटल्यानंतर प्रत्येक विभागाची आणि शाखांची पुन्हा एकदा संघटनात्मक बांधणी करण्याकरता येणारा काळ हा अनुकूल ठरणार आहे. २०२२ ची मुंबई, ठाण्यासह इतर महापलिकांच्या सार्वत्रिक निवडणूक येत्या ऑक्टोबरपर्यंत होणार आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षात ते बंडखोरी मोडून काढल्यानंतर पुन्हा एकदा संघटनात्मक बांधणीसाठी मुंबईसह इतर शहर आणि राज्यभर उद्धव ठाकरे यांना फिरावे लागणार आहे आणि आता ते मुख्यमंत्रीपदी नसल्याने त्यांना संघटनात्मक बांधणीसाठी अधिक वेळ देता येणार आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमी संघटनात्मक बांधणी महत्त्वाची मानली जात आहे. त्यामुळे त्यांचे मुख्यमंत्री पद जाणं हे एक प्रकारे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा मानले जात आहे. जेणेकरून त्यांना पक्षाची विस्कटलेली घडी पुन्हा एकदा संघटनात्मक बांधणी करत बसवता येईल. ज्यामुळे येत्या निवडणुकीत जो काहीनामुष्की कारक पराभव स्वीकारावा लागणार होता, त्याची तीव्रता कमी करता येईल. पक्षाचे नगरसेवक अधिक निवडून आणण्याचा प्रयत्न करता येईल, असं राजकीय जाणकारांचे म्हणणं आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.