होय, समाजप्रबोधक वीर सावरकर आणि डॉ. आंबेडकर अनेकदा भेटले होतेच!

153

भारताला स्वातंत्र्य मिळेलही पण हा देश सामाजिकदृष्टया एकसंध राहिला, तरच तो मजबूत राहील, हा दूरदृष्टीचा विचार करून वीर सावरकरांनी स्थानबद्धतेत असताना काळानुरूप समाजप्रबोधनाचे कार्य हाती घेतले, याची आठवण मुद्दाम ‘६ डिसेंबर’ रोजी करणे क्रमप्राप्त आहे, कारण याच कार्यासाठी उभ्या आयुष्याचा यज्ञ करणारे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन आहे. पण दुर्दैवाने काँग्रेसने एक गठ्ठा मतांच्या राजकारणासाठी बहुसंख्य हिंदू समाजाला जाती-जातीत विभागून ठेवत त्यांचे कंपू बनवले. परिणामी आजही रोटी-बेटी व्यवहार भारतीय समाजासाठी दिवास्वप्न आहे. काँग्रेसच्या या राजकारणाला सुरुंग लावू पाहणारे वीर सावरकर आणि डॉ. आंबेडकर या दोन महानायकांना काँग्रेसने पद्धतशीरपणे भारतीय राजकरणातून बाजूला केले. हे दोन महानायक कधीच एका विचारांचे नव्हते, त्यांच्या कधी भेटी झाल्याच नाही, असे रुजवले जाते, पण तसे नव्हते, हे सांगण्याचे औचित्य या दिवसाशिवाय दुसरे असूच शकत नाही.

भारतीय समाजकारणात प्रबोधनाचे कार्य करणा-या दोन विभूती 

सावरकर म्हणत, न्यायासाठी, मानवतेसाठी, समतेसाठी आणि बंधुत्वासाठी अशा सर्वच कारणांनी अस्पृश्यता नष्ट झाली पाहिजे. स्पर्श बंदी मोडणे म्हणजे अस्पृश्यता नष्ट करणे, रोटी बंदी मोडणे म्हणजे एकमेकांनी शिजवलेले अन्न विनासंकोच सोवळ्या ओवळ्याच्या कल्पना त्याज्य मानून सेवन करणे, त्यासाठी सावरकरांनी सहभोजनांचा धूमधडाका महाराष्ट्रात उडवून दिला. बेटी बंदी मोडणे म्हणजे हिंदुंमध्ये आंतरजातीय विवाह करणे. सावरकरांनी स्वत:च असे पंधरा वीस आंतरजातीय विवाह घडवून आणले होते. वेदोक्त बंदी, शुध्दी बंदी, समुद्र बंदी आणि व्यवसाय बंदी या सर्व बंदी सावरकरांनी प्रत्यक्ष मोडल्या. चातुर्वर्ण्यावर आधारित समाजरचना नष्ट करण्यावर वीर सावरकर आणि डॉ. आंबेडकर यांच्यात दोघांचेही एकमत होते.

(हेही वाचा गांधी-नेहरू यांची पत्रे हाच खरा माफीनामा! रणजित सावरकरांचा घणाघाती हल्ला)

डॉ. आंबेडकरांना सावरकरांचा सप्तबेड्या मोडण्याचा कार्यक्रम मान्य होता. सावरकरांना स्थानबद्धतेमुळे रत्नागिरी सोडणे शक्य नसले तरी महाडचा सत्याग्रह असो किंवा काळाराम मंदीराचा असो सावरकरांनी आणि सावरकर अनुयायांनी आंबेडकरांना त्या सर्व लढ्यात खुल्यादिलाने साथ दिलेली दिसते. स्वातंत्र्यवीरांचे धाकटे बंधू डॉ. नारायणराव सावरकर आपल्या अनुयायांबरोबर त्या लढ्यात होते. डॉ. सावरकर काळाराम मंदीराच्या सत्याग्रहात कसे होते यावर आंबेडकरांचे चरित्रकार चांगदेव खैरमोडे यांनी चांगला प्रकाश टाकला आहे. देवदर्शनाचा हक्क पूर्वास्पृश्यांना मिळावा म्हणून सावरकर जागरुक होतेच. सर्व हिंदुंसाठी दर्शनास खुले असलेले पतितपावन मंदीर त्यांनी शेठ भागोजी कीर या सुधारक धनिकाकडून बांधून घेतले ते आता बहुतेकांस माहिती आहेच. मात्र या पतितपावन मंदीराविषयी काही अभ्यासकांचा प्रामाणिक किंवा अप्रामाणिक गैरसमज आहे की ते केवळ पूर्वास्पृश्यांसाठी बांधलेले स्वतंत्र मंदीर आहे. पतित पावन मंदीर हे अस्पृश्यांसाठी बांधलेले वेगळे मंदिर नव्हते तर सर्व हिंदूंसाठी बांधलेले होते. त्या पतित-पावन मंदिराच्या आधी सावरकरांनी रत्नागिरीतील प्राचीन विठ्ठल मंदिर लढा देऊन सर्वांसाठी मुक्त केले. इतकेच नव्हे तर त्या सर्व जिल्ह्यातील सुमारे चारशे ते पाचशे जुनी मंदिरे सावरकरांनी सर्व हिंदूंसाठी मुक्त करवली. त्यानंतर बऱ्याच काळाने साने गुरुजींनी पंढरपूरचे मंदिर मुक्त करण्याचा जो लढा दिला त्यालाही सावरकरांनी पाठिंबा दिला. स्वतः सानेगुरुजींनीच तशी नोंद केली आहे.

अशा झाल्या दोन विभूतींच्या भेटी! 

सावरकर आणि आंबेडकर ही दोन नररत्ने महाराष्ट्राला लाभली. यांच्यात जशा भेटीगाठी होत मित्रत्वाचे संबंध होते त्याच बरोबर काही बाबतीत सहकार्य होते तसेच काही बाबतीत मतभेद सुद्धा होते. एकमेकांविषयी आदर होता तसाच एकमेकांवर कडक टीकासुद्धा करत असत. आणि तसे असणे स्वाभाविक होते. दोघांची जी समान आणि ठळक कार्यक्षेत्रे आहेत ती स्थूलमानाने पुढीलप्रमाणे: 1. सामाजिक क्षेत्र 2. राजकीय क्षेत्र 3. मुस्लीम प्रश्न ४. देशाचे अखंडत्व किंवा फाळणी 5. धर्मांतर

savarkar1

आचार्य कै. बाळाराव सावरकर यांनी आपल्या साधार आणि ससंदर्भ लिहिलेल्या चार खंडात्मक सावरकर चरित्रात दिलेल्या माहितीवरुन या दोन्ही महापुरुषांच्या राजकीय संबंधांवर आणि वैयक्तिक मैत्रीपूर्ण संबंधांवर बराच प्रकाश पडतो.

(हेही वाचा स्वातंत्र्यवीर सावरकरः पहिले आणि सर्वात मोठे सैन्यकूटनीतीक व सामरिक तज्ज्ञ)

  • ऑगस्ट १९२९ मधे डॉ. आंबेडकर एका न्यायालयीन कामासाठी रत्नागिरीला येणार होते. विठ्ठल मंदिरात सावरकरांच्या अध्यक्षतेखाली त्यांचे भाषण करायचे ठरले. तिथे डॉ. आंबेडकर यांना भाषण करू न देण्यासाठी बराच विरोध झाला, तरीही वीर सावरकर आणि डॉ. आंबेडकर यांच्यात अर्धा तास भेट झाली. (सावरकरांच्या सहवासात भाग-एक आ.ग. साळवी, आणि रत्नागिरी पर्व पृ. १९७)
  •  २८ जाने १९३९ ला दादर येथे निवडणूक सभेत सावरकर आणि आंबेडकर या दोघांनीही एकाच व्यासपीठावरुन भाषण केले. (हिंदुमहासभा पर्व १ पृ.१८०)
  • ५ मे १९३९ साध्यनुकूल सहकार या आपल्या धोरणाला अनुसरुन लंडनमधील भारतमंत्र्यांचे समादेशक आणि मध्य प्रांताचे माजी राज्यपाल डॉ. श्री. राघवेंद्र राव यांच्या सन्मानार्थ हिंदुमहासभेने दिलेल्या उपहाराच्या कार्यक्रमाला वीर सावरकर उपस्थित होते. हिंदुसभेच्या इतर सर्व नेत्यांसोबतच डॉ. बाबासाहेब आंबेडकरसुध्दा उपस्थित होते. या धोरणास अनुसरुन असलेल्या समारंभात डॉ. आंबेडकरांची सावरकरांबरोबरची उपस्थिती लक्षणीयच म्हणावी अशी होती. हिंदुहित हे सावरकरांचे सर्वात प्राधान्य असलेले साध्य होते. (हिंदुसभा पर्व १ पृ. २१५-२१६)
  • सोमवार, ९ ऑक्टोबर १९३९ ला सकाळी ११ ते १२ एक तास सावरकर व व्हाईसरॉय यांची भेट झाली. कॉंग्रेसच्या हिंदुहितविरोधी आणि मुस्लिम तुष्टीकरणनीतीला विरोध करत एक महत्वाचा राजकीय पर्याय म्हणून हिंदुमहासभा उभी रहात होती, म्हणून हिंदुपक्षाचे म्हणणे काय आहे हे जाणून घेण्यासाठी व्हॉईसरॉय कॉंग्रेस नेत्यांप्रमाणेच सावरकरांशीही स्वतंत्रपणे भेटीगाठी घेऊ लागले होते. तिथेच व्हाईसरॉयच्या भेटीसाठी आलेल्या डॉ. आंबेडकरांशी सावरकरांची भेट झाली. (हिंदुसभा पर्व १ पृ. २७६)
  • १३ जानेवारी १९४० रोजी वीर सावरकर आणि डॉ. आंबेडकर यांची भेट दादर येथील सावरकरांचे घर सावरकर सदन येथे झाली. या प्रसंगी सावरकरांची प्रकृती ठीक नव्हती म्हणून ते घरीच राहून कार्यालयाची कामे पहात होते. त्यावेळी डॉ. आंबेडकर आणि आचार्य दोंदे हे दोघेही सावरकरांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यास सावरकर सदन मध्ये येऊन भेटले. (हिंदुसभा पर्व -१ पृ. ३०४)

(हेही वाचा इतिहासातील चुकांची पुनरावृत्ती नको असेल, तर वीर सावरकरांना आत्मसात करा! – रणजित सावरकर)

  • ६ फेब्रुवारी १९४० या दिवशी पारशी समाजाची एक सभा झाली. या सभेला स्वातंत्र्यवीर सावरकर त्यांचे बंधु डॉ.नारायणराव सावरकर यांच्यासोमवेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरही सावरकर बंधुंसोबत एकाच व्यासपीठावर उपस्थित राहीले. (हिंदुसभा पर्व -१ पृ .३०८-३०९)
  • सावरकर आणि आंबेडकरांची पुढील भेट १७ एप्रिल १९४० च्या सुमारास चुनीलाल मेहता यांच्या घरी झाली. चुनीलाल यांच्या घरी भरलेल्या कॉंग्रेसेतर पक्षांच्या या सभेला स्वा.सावरकर, डॉ.आंबेडकर तसेच रँगलर र.पु.परांजपे उपस्थित होते. या सभेत एक कॉंग्रेस विरोधी आघाडी निर्माण करावी यावर चर्चा करण्यात आली. (हिं.स.पर्व-१- पृ. ३२८)
  • १४-१५ मार्च १९४१ ला मुंबईत ताजमहाल हॉटेल मध्ये कॉंग्रेस व मुस्लीम लीग वगळून अन्य पक्षांची बैठक भरली. आंबेडकरही सावरकरांसमवेत या बैठकीला उपस्थित होते. (अखंड हिंदुस्थान लढा पर्व पृ.१८-१९)
  • ११ एप्रिल १९४३ ला सावरकर दिल्लीत होते. त्यावेळी त्यांनी हिंदुसभाभवनात कार्यकर्त्यांशी चर्चा केली. त्यानंतर डॉ. आंबेडकर व्हाईसरॉयच्या कार्यकारणीचे एक सदस्य असल्याने त्या संदर्भात सावरकरांनी डॉ.आंबेडकरांशी एक तास विचारविनिमय केला. (अ. हिं. लढा पर्व पृ. १९४)
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.