आम्ही रिक्षावाले असल्याचा आम्हाला अभिमान, फडणवीसांचे उद्धव ठाकरेंना चोख प्रत्युत्तर

95

माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. रिक्षावाल्याच्या रिक्षेला ब्रेक नव्हता, अशी शब्दांत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना टोला लगावला. उद्धव ठाकरेंच्या या टीकेला आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. आम्ही रिक्षावाले असल्याचा आम्हाला अभिमान आहे. कारण पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात सर्वसामान्य माणूसच राजा आहे, असे म्हणत फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

आम्हाला अभिमान आहे

काँग्रेस पक्षाने देखील पंतप्रधान मोदींना चायवाला म्हणून हिणवलं. पण मोदींनी काँग्रेसला असं पाणी पाजलं त्यामुळे काँग्रेसची अवस्था आज काय आहे, हे आपण बघतोय. आणि जर आम्ही रिक्षावाले, पान टपरीवाले, चहा टपरीवाले, रस्त्यावरचे विक्रेते असलो तरी त्याचा आम्हाला अभिमान आहे. या देशात स्वाभिमानाने जो जगतो तोच खरा राजा असतो, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.

सामान्य माणूसच राजा

सोन्याचा चमचा घेऊन जे जन्माला येतात आणि ज्यांना असं वाटतं की राज्य करणं हा आमचाच अधिकार आहे, त्यांनी समजून घ्यावं की पंतप्रधान मोदींच्या या लाटेत सामान्य माणूसच राजा होणार आहे आणि तोच देशाची सेवा करणार आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे.

उद्धव ठाकरेंची टीका

विधान भवनात एकनाथ शिंदे यांनी विश्वासदर्शक ठराव यशस्वी झाल्यावर भाषण केले. त्यांनी केलेल्या मनमोकळ्या भाषणामुळे विरोधकांनाही हसू आवरता आले नाही. याच भाषणावरुन उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. विधान भवनात बोलताना रिक्षावाल्याची रिक्षा अगदी सुसाट सुटली होती. रिक्षाला ब्रेक नव्हता, अशी टीका माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.