राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी कायदा सुव्यवस्थेबाबत मुख्यमंत्र्यांना दोन दिवसांचं विशेष अधिवेशन बोलावण्याच्या सूचना पत्राद्वारे केल्या होत्या. मात्र राज्य सरकारने राज्यपालांच्या या पत्राला केराची टोपली दाखवली आहे. जरी राज्यपालांनी पत्र लिहिले असले तरी देखील ठाकरे सरकार दोन दिवसांचे अधिवेशन घेणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सरकारला बदनाम करण्यासाठी अधिवेशनाची मागणी होत असल्याचा आरोप सत्ताधारी करत आहेत. मुंबईतील साकिनाका बलात्कार प्रकरणावरुन कायदा-सुव्यवस्थेकडे राज्यपालांनी बोट दाखवले होते. इतकंच नाही तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना राज्यपालांनी पत्र लिहिले आहे.
काय आहे राज्यपालांच्या पत्रात
राज्यातील महिला सुरक्षा, कायदा व सुव्यवस्था आणि दिशा कायदा इत्यादी विषयांवर चर्चा करण्यात यावी, असे राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात सांगितले आहे. तसेच याच विषयांवर चर्चा करण्यासाठी दोन दिवसांचे एक अधिवेशन बोलवावे, अशी मागणी राज्यपालांनी केली आहे.
(हेही वाचाः आजवर या नेत्यांवर सोमय्यांचे भ्रष्टाचाराचे आरोप, पुढे काय झाले? वाचा)
काय आहे साकिनाका प्रकरण
पश्चिम उपनगरातील साकिनाका पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका ३० वर्षीय महिलेवर नराधमाने बलात्कार करुन, तिच्या गुप्तांगात लोखंडी रॉड टाकण्यात आला असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. या महिलेची प्रकृती चिंताजनक होती, तिच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेर तिचा ११ सप्टेंबर रोजी मृत्यू झाला. पीडित मृत महिला ही २ मुलींची आई होती. ज्या टेम्पोत त्या महिलेवर अमानुष अत्याचार करण्यात आले, त्याच टेम्पोतून त्या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले. आरोपी मोहन चौहानवर बलात्कार, जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आता त्या आरोपीवर खून करणे हा गुन्हा दाखल केला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आरोपीला पोलिसांनी अटक केली.