महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद : केंद्र सरकारने नेमली सहा जणांची संयुक्त समिती

98
येत्या काळात महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांत विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्याआधी महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून दोन्ही राज्यांतून सहा मंत्र्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे.
सीमाप्रश्नावरून महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात सातत्याने तणावाचे वातावरण निर्माण होते. त्यामुळे डिसेंबर महिन्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची संयुक्त बैठक घेतली होती.
त्यावेळी दोन्ही राज्यात समन्वय असावा आणि सीमाप्रश्नासह इतर विषयांबाबत सातत्याने चर्चा व्हावी, यासाठी दोन राज्यातील प्रत्येकी तीन-तीन जणांची कमिटी स्थापन करण्यात येईल, असे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिले होते. त्यानुसार गृहमंत्रालयाने दोन्ही राज्यांतून नावे देण्याची सूचना केली होती. त्यानुसार दोन्ही राज्यांनी नावे दिल्यानंतर कमिटी नेमण्यात आली आहे.

समितीत कोण?

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारने नेमलेल्या समितीमध्ये महाराष्ट्रातून मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री शंभूराज देसाई व मंत्री दीपक केसरकर, तर कर्नाटक राज्यातून मंत्री गोविंद कारजोळ, मंत्री शशिकला जोल्ले व मंत्री माधुस्वामी यांचा समावेश आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.