सीमावादावर राज ठाकरे कडाडले; म्हणाले, महाराष्ट्रातून कोण खतपाणी घालत आहे, सरकारने पहावे…

92

महाराष्ट्र-कर्नाटकाचा सीमावाद उफाळून यावा, ह्यासाठी पुन्हा कोणाकडून तरी प्रयत्न सुरु झाले आहेत. तिकडून कोण खतपाणी घालतंय हे तर उघड दिसतंय, पण इथे कोण ह्याला खतपाणी घालत आहे का? हे सरकारने पहायला हवं, अशी सूचना करतानाच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी आता जरा तोंडावर आवर घालावा, अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुनावलं आहे. तसेच सीमावादाचा प्रश्न चिघळू देऊ नये. महाराष्ट्राच्या गाड्यांची तोडफोड, तिथल्या मराठी माणसांना त्रास असले प्रकार सुरु आहेत ते तात्काळ थांबवा, असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

कर्नाटकच्या निवडणुकांसाठी मुद्दा उकरला

सीमावादाचा प्रश्न चर्चेने आणि सामोपचारानेच सुटायला हवा, पण जर समोरून संघर्षाची कृती केली जाणार असेल तर, मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेना काय करू शकते ह्याची चुणूक माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी दाखवली आहे. त्यामुळे गरज पडली तर आमचं उत्तर पण तितकंच तीव्र असेल हे विसरू नका. येणाऱ्या २०२३ च्या कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकांसाठी हा मुद्दा उकरून काढला जातोय आणि महाराष्ट्राला नाहक छळलं जातंय. माझं मराठी बांधवांनाही हे सांगणं असेल कि त्यांना जे हवंय ते नाही द्यायचं आपल्याला जे हवंय तेच आपण करायचं.

(हेही वाचा समान नागरी कायदा म्हणजे स्त्रियांना अनेक पती करण्याचा अधिकार, जावेद अख्तरांनी तोडले अकलेचे तारे)

केंद्र सरकारनेही यात वेळीच लक्ष घालावे

अचानकपणे चहुबाजुंनी राज्याच्या सीमांवर दावा सांगितला जातोय, हे प्रकरण साधंसोपं नाही, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या भूमीकडे येणारी बोटं पिरगळली जातील हे बघावं. इथे आपण कुठल्या पक्षाचे आहोत हे विसरून, महाराष्ट्राचे आहोत हे स्मरून कृती व्हावी अशी अपेक्षा. केंद्र सरकारनेही ह्या प्रश्नात वेळीच लक्ष घालावे आणि हा वाद चिघळणार नाही हे पहावं, असेही राज ठाकरे म्हणाले.

तर मराठी जनता तयार

कर्नाटक आणि महाराष्ट्र ह्यांच्यात कमालीचा एकजिनसीपणा आहे, आज इथल्या अनेकांची कुलदैवतं कर्नाटकात आहेत तर अनेक कन्नडिगांची कुलदैवतं महाराष्ट्रात आहेत. थोडक्यात दोन राज्यांतील बंध हा मजबूत आहे. त्यामुळे संघर्ष होऊच नये. पण तरीही जर समोरून कर्नाटकाची भाषा निव्वळ आव्हानाची असेल तर ते स्वीकारायला महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि इथली मराठी जनता तयार आहे, अशा शब्दात राज ठाकरे यांनी ललकारलं आहे. सरतेशेवटी संघर्ष न होण्यात आणि मैत्र टिकण्यातच सर्वांचं हित आहे, असेही राज ठाकरे म्हणाले.

(हेही वाचा महिलांना फसवून वेश्या व्यवसायात ढकलणाऱ्या धर्मांध मुसलमानांना अटक)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.