…म्हणून तुमच्याकडे चिन्हही नाही आणि पक्षाचे नावही नाही; केसरकरांचा ठाकरेंवर हल्लाबोल

141

शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवल्यानंतर आणि पक्षाचे नाव वापरण्यावरही निवडणूक आयोगाने मनाई केल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर केलेल्या टीकेला शिंदे गटाचे प्रवक्ते आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी प्रत्यु्त्तर दिले आहे. बाळासाहेब ठाकरे आणि हिंदुत्वाच्या विचारापासून लांब गेलात म्हणून आपले चिन्ह गेले, पक्ष तुमच्यापासून लांब गेला याची जाणीव आदित्य ठाकरेंनी ठेवावी, असा हल्लाबोल दीपक केसरकरांनी आदित्य ठाकरेंवर केला आहे.

दीपक केसरकर म्हणाले की, लोकांची खोटी सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न आदित्य ठाकरे करत आहेत. हे जनतेला कदापिही मान्य होणार नाही. जनतेला विकास हवा असून,अडीच वर्षाच्या कालावधीत काय विकास केला याचा लेखाजोखा तुम्ही मांडू शकत नसल्याची टीकाही केसरकर यांनी केली. सत्ताकाळात आलेल्या लोकांना न भेटणे, वाईट शब्दांमध्ये बोलणे, लोकांना कामे न करणे, या सगळ्या वागण्याचे लोकांनी तुम्हाला प्रायश्चित दिले असल्याची बोचरी टीका केसरकरांनी केली आहे.

आदित्य ठाकरे काय म्हणाले?

निवडणूक आयोगाने शिवसेनेचे निवडणूक चिन्ह आणि नाव गोठवल्यानंतर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी संताप व्यक्त करत शिंदे गटावर टीका केली. खोकेवाल्या गद्दारांनी आज शिवसेना नाव आणि चिन्ह गोठवण्याचा नीच आणि निर्लज्ज प्रकार केला आहे. महाराष्ट्राची जनता हे सहन करणार नाही. लढणार आणि जिंकणारच. आम्ही सत्याच्या बाजूने सत्यमेव जयते, असे आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.