महाराष्ट्राने एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेसाठी ठरवली विकासाची पंचसूत्री

100

कोविड काळ असूनही राज्याने प्रगती आणि विकास यात कुठेही खंड पडू दिला नाही. महाराष्ट्राने देशातले एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था असलेले पहिले राज्य होण्यासाठी विकासाची पंचसूत्री ठरविली असल्याचे, गौरवोद्गार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काढले. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६२ व्या वर्धापन दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज मैदानात आयोजित मुख्य शासकीय समारंभात राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

राज्याचे दुसरे स्थान

यावेळी राज्याला संबोधित करताना, राज्यपाल कोश्यारी म्हणाले की, कोरोनाच्या तीन लाटांचा नियोजनबद्ध रितीने सामना करीत असताना, महाराष्ट्राने देशात एक उदाहरण निर्माण केले आहे. राज्यातल्या ९२ टक्क्यांपेक्षा अधिक प्रौढ लोकसंख्येला लसीचा कमीत कमी एक डोस दिला असून, उर्वरित लसीकरण गतीने पूर्ण होत आहे. नीती आयोगाने जाहीर केलेल्या Export Preparedness Index मध्ये महाराष्ट्र राज्य देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. याबाबत आनंद व्यक्त करून केंद्र शासनाच्या ‘सुशासन निर्देशांक अहवाल- २०२१’ मध्ये महाराष्ट्राने दुसरे स्थान मिळवले असल्याचे त्यांनी सांगितले.

शासनाचा महत्वपूर्ण निर्णय

राज्यपाल म्हणाले, इलेक्ट्रिक वाहनांबाबत राज्य शासनाने तयार केलेले धोरण व्यापक आणि सर्वांगिण असून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत राज्यातील इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी १५७ टक्क्यांनी वाढली आहे. इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन उभारणाऱ्या नागरिकांना तसेच गृहनिर्माण संस्थांना त्यांच्या मालमत्ता करात सूट देण्याचा महत्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे. शहरे कार्बन न्यूट्रल करण्याच्या अनुषंगाने राज्यातील ४३ अमृत शहरे रेस टू झिरोमध्ये सहभागी झाली आहेत.

( हेही वाचा: नंबर सेव्ह न करताही करु शकता व्हाॅट्सअ‍ॅप मेसेज, ही आहे ट्रिक )

शिवभोजन  केंद्राचे कौतुक

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ४८८ शाळा आदर्श शाळा म्हणून पहिल्या टप्प्यात विकसित करण्यात येणार असल्याचे राज्यपाल म्हणाले. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा लवकरात लवकर देण्यात यावा, याकरता शासन केंद्राकडे पाठपुरावा करीत असून, मुंबई येथे मराठी भाषा भवनाचे भूमिपूजन झाले असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यपाल म्हणाले, ग्रामीण भागात महाआवास योजनेतून पावणेपाच लाख घरे देण्यात आली, तसेच जल जीवन मिशनमध्ये १७४ पाणीपुरवठा योजना सुरू होत आहेत. १०० कोटी रुपये रकमेचा स्टार्टअप फंड उभारण्यात येत आहे. तर मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात होतकरू युवक-युवतींच्या मंजूर प्रकल्पांतून सुमारे ११०० कोटी रूपये गुंतवणूक होत आहे. कोरोना संकटकाळात गरीब आणि गरजूंना शिवभोजन थाळी नि:शुल्क उपलब्ध करुन देण्यात आली. सध्या राज्यात १ हजार ५४९ शिवभोजन केंद्रे सुरू असून ९ कोटी १८ लाख इतक्या शिवभोजन थाळ्यांचे वितरण करण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.