गांधी हत्येचे धागेदोरे काँग्रेसपर्यंत पोहचतात! रणजित सावरकरांचा ‘एबीपी माझा कट्ट्या’वरून खळबळजनक आरोप

121
तुषार गांधी यांनी सावरकरांनीच नथुराम यांना पिस्तूल दिले, असा आरोप केला हा अत्यंत मूर्खपणाचा आरोप आहे. जगदीश गोयल या साक्षीदाराने सांगितले कि, हे पिस्तूल मला नाथिलाल जैन या माणसाने दिले, ते पिस्तूल इटालियन आर्मीचे होते. पोलिसांनी नाथिलाल जैन याला अटक केली होती, तो लाल किल्ल्यातच होता, त्याला पोलिसांनी हजरच केले नाही, त्याला कारण होते जैन हा काँग्रेसच्या मंत्र्यांचा मेव्हणा होता. हे ऑन रेकॉर्ड आहे. याचे धागेदोरे काँग्रेसपर्यंत पोहचतात. म्हणून जैन याला कोर्टातच उपस्थित केले नाही. हा आरोप या प्रकरणातील आरोपीचे वकील डॉ. परचुरे यांनी कोर्टात केला आहे, अशी खळबळजनक माहिती स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष आणि वीर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर यांनी केला. एबीपी माझा या वृत्तवाहिनीच्या माझा कट्टा या कार्यक्रमात ते बोलत होते.

प्रश्न – स्वातंत्र्यात ज्यांनी सहभाग घेतला त्यांना वादात खेचत आहोत, हे कितपत योग्य आहे?
रणजित सावरकर – तुमच्या प्रश्नातच उत्तर आहे, ज्या स्वातंत्र्यासाठी स्वातंत्र्यसैनिकांचे योगदान दिले, हालअपेष्टा सहन केल्या, त्याग केला, त्याचे तुम्हाला क्रेडिट द्यायचे नसेल, त्यांची मते तुम्हाला मान्य नसतील तर नसूदे, पण वारंवार हे होत आहे. गेल्या २० वर्षांपासून हे होत आहे. जेव्हापासून अटलबिहारी सरकार सत्तेवर आले, तेव्हापासून हे सुरु झाले आहे. मध्ये १० वर्षे काँग्रेसचे सरकार होते तेव्हा बंद झाले होते आणि आता मोदी सरकार आल्यावर हे पुन्हा सुरु झाले आहे. हे स्पष्ट आहे कि राजकारणासाठी सावरकरांचा वापर केला जात आहे, आज हिंदुत्वादी सरकार आहे, या हिंदुत्वाचे प्रणेते वीर सावरकर आहेत, त्यांच्यावर हल्ला केला तर मतांचे ध्रुवीकरण करायला मदत होईल असा अर्थ सरळसरळ दिसतो आहे. २००० साली पहिला आरोप झाला कि वीर सावरकरांना कपूर कमिशनने गांधी हत्येत दोषी ठरवला असा तो आरोप होता. जे धादांत खोटे आहे, सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट सांगितले कि, वीर सावरकरांना कपूर कमिशनने दोषी ठरवले नाही. कपूर कमिशन कुणी वाचले तर लक्षात येईल कि महात्मा गांधी यांचे प्राण वाचवण्यात काँग्रेस कसे अपयशी ठरले, याचा पूर्ण आढावा या कमिशनमध्ये आहे. पण त्यातील एकच वाक्य काढून वीर सावरकरांना दोषी ठरवले.
प्रश्न – ब्रिटिशाना पत्र लिहिण्याचा सल्ला गांधींनी दिला होता याकडे तुम्ही कसे पाहता?
रणजित सावरकर – ब्रिटिशांकडे पिटिशन करण्याचा सल्ला गांधींनी वीर सावरकर यांच्या भावाला दिला होता. १३ मे १९१३ मध्ये सावरकरांनी पहिला अर्ज केला होता, तो त्यांनी सुटकेसाठी केला नव्हता, तर तेव्हा अंदमान जेलचा नियम होता कि, बंदीवानांना केवळ ६ महिने कोठडीत ठेवायचे नंतर त्यांना कोठडीतून बाहेर काढायचे, क्रांतीकारकांना ३ वर्षे बाहेर काढले नव्हते म्हणून ती पिटिशन होती. त्यात त्यांनी आरोप केले आहेत, तुम्हा आम्हाला राजकीय बंदीचा दर्जा देता मग आम्हाला त्याप्रमाणे अधिकार द्या, जे गांधींना देता, जर तुम्ही आम्हाला सामान्य बंदींचा दर्जा देता तर आम्हाला तशा सवलती द्या, तेव्हा त्यांना सांगण्यात आले तुम्ही धोकादायक आहात. तेव्हा सावरकर यांनी स्पष्ट म्हटले आहे कि ब्रिटिश सरकार राजकीय बंदी आणि सामान्य गुन्हेगार यांच्यामधील वाईटातील वाईट तरतुदी आम्हाला लागू करत आहेत, असे सावरकर यांनी म्हटले आहे. असा हा माफीनामा कसा असू शकेल? ब्रिटिश अधिकारी यांनी स्वतः लिहिले आहे कि, सावरकर यांची दया याचिका असली तरी त्यात कुठे खंत किंवा माफी नाही. सावरकरांनी असेही लिहिले होते कि जगातील बंदीवानांना अशी वागणूक दिली जात नाही  तशी आम्हाला वागणूक दिली जात आहे. माफीनाम्यात कुणी अशी भाषा वापरतात का? सावरकरांनी सुटकेचा अर्ज १९१४ साली केला होता, तेव्हा त्यांनी सहकार्याची भूमिका घेऊ असे म्हटले होते, त्यात सावरकर असेही म्हणाले कि उगाच शस्त्र हाती घ्यायला आम्ही मूर्ख नाही. तशी परिस्थिती राहिली नाही म्हणून सहकार्याची भूमिका घेतो, तेव्हा गांधीही त्याच भूमिकेत होते.

प्रश्न – बिरसा मुंडा यांनी जेलमध्ये असताना सुटकेसाठी पत्र लिहिले नाही पण सावरकरांनी अनेक पत्र लिहिली असा आरोप राहुल गांधींनी केला?
रणजित सावरकर – बिरसा मुंडा यांना सुटकेची संधी नव्हती हे खरे आहे, पण अनेकांनी पत्रे लिहिली आहेत. गांधींचे विचार सावरकरांवर लादू नका. मी जे विचार करेन तर तेच करेन, सारे गांधींचे तत्व होते. क्रांतिकारकांचे विचार वेगळे होते, त्यांचे म्हणणे होते कि शत्रूला दिलेले वचन हे मोडण्यासाठीच असते, सावरकरांनी स्वतः ते लिहिले आहे. ते अन्य क्रांतिकारकांनाही असे अर्ज करायला सांगायचे. सच्चिदानंद सन्याल हे जे क्रांतिकारक होते, त्यांना खुनाच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा झाली होती, १९१३ साली ते जेलमध्ये येतात आणि १९१९ मध्ये त्यांची सुटका झाली आहे. त्यांनीही पिटिशन केली होती, संन्याल यांनी त्यांच्या आत्मचरित्रात म्हटले आहे, मी सावरकर यांच्याप्रमाणेच अर्ज केला पण माझी सुटका झाली सावरकरांची नाही, कारण सावरकर यांना सोडले तर महाराष्ट्रात क्रांतीचा उद्रेक होईल, अशी ब्रिटिशांना भीती वाटत होती. कोठडीमध्ये १० वर्षे ठेवलेले एकमेव कैदी म्हणजे सावरकर होते. १९२४ साली जेव्हा सावरकर यांना सोडण्यात आले आणि रत्नागिरीत स्थानबद्ध केले तेव्हा अंदमानापेक्षा छोट्या कोठडीत बंद केले होते. तेव्हाच गांधींनाही सोडले होते. १९२२ साली असहकार आंदोलनाच्या वेळी गांधींना अटक करण्यात आली आणि सहा वर्षांची शिक्षा झाली पण त्यांना १९२४ सालीचा सोडण्यात आले. सावरकरांवर अट घातली कि पुन्हा राजकरणात भाग घेणार नाही, तशी अट गांधींवर लादली नाही. गांधींनी स्वतःच ती लावून घेतली. गांधींनी १९२८ पर्यंत राजकारणाचा पूर्ण त्याग केला होता. १२ फेब्रुवारी १९२२ ला काँग्रेस कार्यकारिणीत ठराव झाला कि आता बिटिशांच्या विरोधात एकही आंदोलन घ्यायचे नाही. म्हणजे गांधींनी स्वतःही काही केले नाही आणि राष्ट्रव्यापी आंदोलनही स्थगित केले होते. त्यानंतर १९३१ साली आंदोलन सुरु झाले, इतका कालावधी सगळेच बंद होते. त्या काळात गांधींनी घराघरात चरखा चालवणे, दारू बंदी, अस्पृश्यता निर्मूलन असे कार्यक्रम हाती घेतले. उलट सावरकर अस्पृश्यता निर्मूलन कारण्याआधी मुळावर घाव घाला, जातीभेद नष्ट करावा लागेल, असे म्हणत होते. गांधी त्याच्याच उलट होते, त्यांचा चातुर्वर्णावर, जातीभेदावर विश्वास होता. त्यावर डॉ. आंबेडकर यांनी तिखट टीका केली आहे. गांधींचे हे म्हणणे अमानुष आहे, असे म्हटले होते.

(हेही वाचा दिल्लीत ‘प्रेस कॉन्फरन्स’मधील रॅपिड प्रश्नांवर रणजित सावरकरांची उत्तरांची ‘फायरिंग’)

प्रश्न – सावरकरांनी कायम काँग्रेसच्या पायातपाय घालण्याचा प्रयत्न केला असा आरोप होत आहे, त्यावर काय म्हणणे?
रणजित सावरकर – सशस्त्र आंदोलन हे काय जाहिराती देऊन होत नाही, तो काय मिठाचा सत्याग्रह नाही ज्याचे डेली रिपोर्टींग होत होते. सावरकर रत्नागिरीत होते, तेव्हा भगतसिंगांना फाशी दिली तेव्हा त्याच्या विरुद्ध वामन चव्हाण या सावरकर यांच्या सहकार्याने मुंबईला ब्रिटिश अधिकाऱ्याला गोळ्या घातल्या त्यात त्याला ५ वर्षे शिक्षा झाली. वामन चव्हाण यांनी त्यांच्या आठवणीत लिहून ठेवले आहे कि भगतसिंगांना सावरकर यांची भेट घ्यायची होती, चंद्रशेखर आझाद रत्नागिरीत येऊन राहिले आहेत. पुण्यातील वासुदेव गोगटे होते त्यांनी म्हटले आहे कि त्यांना सावरकरांनी प्रेरणा दिली आणि त्यांनीही ब्रिटिश अधिकाऱ्याला गोळ्या घातल्या , म्हणजे सावरकरांनी चळवळ थांबवली नव्हती. मुख्यमंत्र्यांना आवाहन केले आहे कि, पोलिसांनी हे रेकाँर्ड बाहेर काढावे. १९३७ पासून सावरकरांनी क्रांतिकारक चळवळ सुरु ठेवली नाही कारण ब्रिटिशांनी आधीच भारत सोडून जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी ब्रिटिश प्रशासकीय आधिकाऱ्यांची भरती बंद केली होती. पण त्यांना भारताचे तीन तुकडे करायचे होते संस्थाने वेगळी आणि हिंदू बहुल आणि मुस्लिम बहुल व वेगळे करायचे होते, सावरकरांची आंदोलने अखंड हिंदुस्थानसाठी होती. तेव्हा गांधी जीनांना म्हणाले होते कि तुम्ही पंतप्रधान व्हा मी पाठिंबा देतो, जर तसे झाले असते तर आज काय परिस्थिती झाली असती, सावरकर यांचा यालाच विरोध होता. तसेच डॉ, आंबेडकरांनीही विरोध केला होता, कम्युनिस्ट पक्षानेही विरोध केला होता. माउंट बॅटनला १९४८ ला फाळणी करायची होती कारण जर काय हिंसा घडली तर नियंत्रणात आणता येईल पण नेहरूंनी ती तारीख आधी खेचून घेतली असे म्हणतात कि काँग्रेसला कल्पनाच नव्हती कि रक्तपात होईल.

प्रश्न – तुम्हाला गांधींच्या आंदोलनाचा आदर नाही का?
रणजित सावरकर – सावरकर नेहमी म्हणायचे तुम्ही घरात बसून स्वातंत्र्यासाठी प्रार्थना केली तरी त्याचे योगदान आहे. गांधींच्या आंदोलनाचा आम्हाला आदरच आहे, पण जेव्हा सावरकरांवर आरोप होतो तेव्हा त्याच न्यायाने त्यांचीही भीषण कृत्ये बाहेर काढलीच पाहिजेत, मी संशोधन करून ती बाहेर काढली ती तुमच्या समोर मांडलीच पाहिजेत हे माझे काम आहे. फाळणीचा आरोप जर सावरकरांवर होतो तर फाळणीचे खरे सूत्रधार मला समोर आणावेत लागणार. हे कागदपत्रे माझ्याकडे १५ वर्षांपासून आहेत आम्ही कधीच ते बाहेर काढले नाही, आज जेव्हा हे वारंवार डिवचतात तेव्हा याला उत्तर द्यावे लागते. उत्तरे देऊन मी कंटाळलो आहे म्हणून आता माझे म्हणणे आहे तुम्ही उत्तरे द्या.

प्रश्न – सावरकरांचा राजकारणासाठी दोन्ही बाजूने वापर होतो का?
रणजित सावरकर – सर्व हिंदुत्ववादी संघटना आता सावरकरांचे नाव घेतात यापेक्षा त्यांनी सावरकरांचे हिंदुत्व स्वीकारावे हे खरे तर मला अपेक्षित आहे. सावरकरांचे हिंदुत्व पचवणे कठीण आहे. सावरकरांचा दोन्ही बाजूने राजकारणासाठी वापर होतो हे खरे आहे. काँग्रेसने फायदा घेतल्यावर विरोधी घेणारच. आज जसे शिक्षण वाढत आहे, आजची पिढी धर्माच्या पुढे जाऊन विचार करू लागते तेव्हा सावरकरांचे हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्व त्यांना जास्त आकर्षित करत आहे. सावरकरांबद्दल वाचन वाढत चालले आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.