महाविकास आघाडीने नैराश्यातून केली मोर्चाची घोषणा; भाजपाची टीका

87
जनादेश खुंटीवर टांगून बळकावलेली सत्ता गेल्यामुळे महाविकास आघाडीला नैराश्य आले आहे. त्यांना विरोधकाची भूमिकाही जमत नसून, त्यातून आलेल्या नैराश्यातून त्यांनी १७ डिसेंबरचा मोर्चा घोषित केल्याची टीका भाजपाने केली आहे.
भाजपा प्रदेश कार्यालयात मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये म्हणाले, मुख्यमंत्री म्हणून अपयशी ठरल्याने महाराष्ट्राला संकटांच्या खाईत ढकलणाऱ्या ठाकरेंना आता सीमावादावर कंठ फुटला आहे. सत्तेत असताना याच प्रश्नावर अंग झटकून वादग्रस्त सीमाभाग केंद्रशासित करण्याची मागणी त्यांनी केली, तेव्हा हे उसने अवसान कोठे गेले होते, असा सवाल उपाध्ये यांनी केला.
महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद सोडविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही अशी दर्पोक्ती २०२१ मध्ये करणाऱ्या ठाकरेंचा सूर सत्तेवर येताच बदलला आणि नाकर्तेपणाची जाणीव झाल्यावर जानेवारी २०२१ मध्ये त्यांनी वादग्रस्त भाग केंद्राकडे ढकलण्याचा प्रयत्न करून पाहिला. मुख्यमंत्री असूनही कोणतीच जबाबदारी न घेता, तुमची जबाबदारी तुम्हीच घ्या असे जनतेला सांगणाऱ्या ठाकरे यांनी सीमावादातून पळ काढला होता आणि आता सत्ता, पक्ष काहीच हाती नसताना पुन्हा तोंड उघडले आहे. सत्ताभ्रष्ट झाल्यामुळे आलेल्या नैराश्यातूनच असे प्रकार घडतात, असेही उपाध्ये म्हणाले.

अधिवेशन नागपुरात, मोर्चा मुंबईत

  • येत्या १७ तारखेला मुंबईत मोर्चा काढण्याची तयारी महाविकास आघाडीने सुरू केली आहे. अधिवेशन नागपुरात असताना मोर्चा मुंबईत काढण्याचे आघाडीचे नियोजन पाहता, मोर्चाची जबाबदारी ठाकरेंच्या उरल्यासुरल्या पक्षावर ढकलून बघ्याची भूमिका घेण्याचा कॉंग्रेस-राष्ट्रवादीचा डाव स्पष्ट दिसतो.
  • आता हाताच्या बोटावर मोजण्याएवढे कार्यकर्ते असलेले ठाकरे महामोर्चा काढायला निघाले हाच मोठा विनोद आहे, असेही ते म्हणाले. सत्तेवर असताना महाराष्ट्राचे हित साधणे जमले नाहीच, आता विरोधात बसून राज्याचे अहित तरी करू नका, असा टोलाही उपाध्ये यांनी लगावला.

(हेही वाचा Maharashtra-Karnataka Border Dispute : बेळगावनजीक कानडींचा धुडगूस; शिंदे सरकारचे मंत्री म्हणाले… )

काँग्रेसची कन्नडीगांना फूस

सीमा प्रश्नाच्या मुद्द्यावरून कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटकमध्ये महाराष्ट्रातील काही वाहनांवर जे हल्ले केले, या हल्ल्यांमागे पाठीमागून फूस लावण्याचे काम काँग्रेस व जेडीएस करत असल्याचा आरोप उपाध्ये यांनी केला.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.