राज्यात जातीय सलोखा राखा; Narayan Rane यांचे राजकीय पक्षांना आवाहन

121
Narayan Rane यांचा राहुल गांधी, उद्धव ठाकरेंवर जोरदार प्रहार; म्हणाले...
राज्यात काही दिवसांपासून मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. याच पार्श्वभूमीवर माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे खासदार नारायण राणे (Narayan Rane)  यांनी राज्यातील राजकीय नेत्यांना आवाहन केले आहे. सध्‍या जाती-जातींमध्‍ये द्वेषाचे विष कालवून जातीय सलोखा धोक्‍यात आणण्‍याचे प्रयत्‍न सुरु आहेत. मात्र त्यामध्ये सर्वसामान्यांचा बळी जात आहे. त्यामुळे राजकारण थांबवा आणि जातीय सलोखा राखा, असे आवाहन नारायण राणे यांनी केले आहे. तसेच, राज्यातील सर्व जबाबदार नेत्यांनी एकत्र यावे आणि शांतता राखण्याचा प्रयत्न करावा, असेही नारायण राणे यांनी म्हटले आहे. यासंदर्भात नारायण राणे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

काय म्हटले नारायण राणे यांनी? 

छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या शिवकल्‍याणकारी महाराष्‍ट्रामध्‍ये सध्‍या जाती-जातींमध्‍ये द्वेषाचे विष कालवून जातीय सलोखा धोक्‍यात आणण्‍याचे प्रयत्‍न सुरु आहेत. विविध विचारसरणीचे आणि त्‍यातही नव्‍याने पुढे आलेले काही नेते किरकोळ राजकीय फायदा नजरेसमोर ठेऊन दुहीचे आणि द्वेषाचे विष कालविण्‍याचे पाप करीत आहेत. सर्वसामान्‍यांच्‍या हितासाठी जाती-जातींमध्‍ये संघर्ष निर्माण करीत असल्‍याची बतावणी ही मंडळी करतात. संघर्षामध्‍ये शेवटी सर्वसामान्‍यांचे बळी जातात व नुकसान होते हे मात्र ते विसरतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या महाराष्‍ट्रामध्‍ये ऐतिहासिक काळापासून जातीय सलोख्‍याचे वातावरण आहे आणि गावा-गावांमध्‍ये लोक गुण्‍यागोविंद्याने नांदतात. या वातावरणाला नख लावण्‍याचे प्रयत्‍न हाणून पाडले पाहिजेत. सर्व जबाबदार राजकीय नेत्यांनी एकत्र येऊन महाराष्‍ट्रातील जातीय सलोखा कायम रहावा यासाठी प्रयत्‍न करावेत असे मला वाटते, असे नारायण राणे (Narayan Rane) म्हणाले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.