![Mantralaya : Prohibition of taking more than 10 thousand in the ministry; But how to calculate the pocket money of the visitors? Mantralaya : मंत्रालयात १० हजारांहून अधिक रक्कम नेण्यास मनाई; पण अभ्यंगतांच्या खिशातील पैसे मोजणार कसे?](https://www.marathi.hindusthanpost.com/wp-content/uploads/2023/09/New-Project-92-2-696x377.jpg)
लाचखोरी रोखण्यासाठी मंत्रालयात (Mantralaya) १० हजार रुपयांपेक्षा अधिकची रोकड नेण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र, दररोज हजारोंच्या संख्येने मंत्रालयात येणाऱ्या अभ्यंगतांच्या खिशातील पैसे मोजायचे कसे, असा सवाल सुरक्षा यंत्रणांसमोर उभा राहिला आहे.
गृह विभागाने मंत्रालय (Mantralaya) प्रवेश व सुरक्षेचे नवे नियम नुकतेच जाहीर केले असून, येत्या महिनाभरात त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यानुसार, अभ्यागतांना प्रवेश मिळण्यासाठी पूर्वनोंदणी करूनच वेळ घ्यावी लागेल. ज्या विभागामध्ये काम आहे, त्याच मजल्यावर अभ्यागतांना प्रवेश देण्यात येणार असून पिशवी, बॅग किंवा १० हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम नेता येणार नाही.
मंत्रालयात दररोज सुमारे ३ हजार ५००, तर मंत्रिमंडळ बैठकीच्या दिवशी पाच हजार अभ्यांगत येतात. अशावेळी त्यातील प्रत्येकाच्या खिशात हात घालून रोकड मोजणे सुरक्षा यंत्रणांना शक्य नाही. दुसरे म्हणजे, विमानतळाप्रमाणे कपडे किंवा अंतर्वस्त्रात लपवून आणलेले पैसे पकडण्याची यंत्रणा मंत्रालयात उपलब्ध नाही. सध्या मेटल डिटेक्टरच्या सहाय्याने वैयक्तिक तपासणी केली जाते. त्यात पैसे ट्रेस होत नाहीत. त्यामुळे मंत्रालयीन सुरक्षा यंत्रणांपुढे नव्हे आव्हान उभे ठाकले आहे.
मंत्रालयात (Mantralaya) येणाऱ्या अभ्यंगतांच्या बॅगांची तपासणी करण्यासाठी स्कॅनिंग मशीन उपलब्ध आहे. त्यात बारीकसारीक सगळ्या गोष्टी दिसून येतात. त्यामुळे बॅगमधून कोणी रोकड आणल्यास पकडता येऊ शकेल.
नवी नियमावली काय?
– मंत्रालयाच्या (Mantralaya) मुख्य प्रवेशद्वारातून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्री यांच्याच मोटारगाड्या येतील.
– सनदी अधिकाऱ्यांच्या गाड्या सचिव प्रवेशद्वारातून तर आमदार व इतरांच्या वाहनांना बगीचा प्रवेशद्वारातून आत येता येईल.
– कर्मचाऱ्यांचे जेवणाचे डबे वगळता बाहेरील खाद्यापदार्थ मंत्रालयात आणण्यास प्रतिबंध असतील.
– मेट्रो सबवेमध्ये कर्मचारी व अभ्यांगत यांच्या तपासणीसाठी कक्ष उभा करण्यात येईल.
Join Our WhatsApp Community