एमआयएमचे ओवैसी चांदिवलीत, जलील आझाद मैदानात?

98

एमआयएमने शनिवारी, ११ डिसेंबर रोजी मुस्लिम आरक्षणाच्या मुद्यावर मुंबईत त्रिरंगा रॅलीचे आयोजन केले आहे. त्यासाठी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील हे औरंगाबाद येथून मुंबईकडे यायला निघाले, मात्र त्यांना मुंबईच्या वेशीवर अडवण्याची तयारी मुंबई पोलिसांनी केली आहे. तरीही आम्ही आझाद मैदान गाठणारच, असे जलील म्हणाले आहेत. आझाद मैदान येथे जलील निदर्शने करणार आहेत, तर एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी चांदिवली येथे सभा घेणार आहेत. सभेची सर्व तयारी एमआयएमने पूर्ण केली आहे.

(हेही वाचा परवानगी नाही तरी हजारो मुसलमान एमआयएमच्या मोर्चासाठी मुंबईच्या दिशेने)

मुंबईचे सर्व प्रवेशद्वार बंद 

मुंबई पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईत १० डिसेंबर रोजी मध्यरात्री १२ वाजल्यापासून ते थेट सोमवारी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत मोर्चे, निदर्शने आणि आंदोलनाला परवानगी नाकारली आहे. तसा आदेश काढला आहे. त्या दृष्टिकोनातून पोलिसांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मुंबईकडे येणाऱ्या एमआयएमच्या कार्यकर्त्यांना मुंबईच्या वेशीवरच अडवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार वाशी, मुलुंड आणि दहिसर या मुंबईत येणाऱ्या प्रवेशद्वारांवर कडक बंदोबस्त ठेवला आहे. त्याठिकाणी एमआयएमच्या कार्यकर्त्यांची वाहने अडवली जाणार आहेत.

रेल्वेचा वापर करून येणार मुंबईत? 

दरम्यान एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी मुस्लिम आरक्षणाच्या मुद्यावर आमचा मोर्चा होणारच आहे, आम्ही आझाद मैदानात पोहचणारच, असे सांगितले आहे. अशा वेळी जर रस्ते मार्गावरून मुंबईकडे येणाऱ्या सर्व मार्गांवर प्रतिबंध करण्याची व्यवस्था पोलिसांनी केली तर कदाचित एमआयएमचे कार्यकर्ते हे कल्याण येथून लोकलने आझाद मैदानापर्यंत पोहचण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे रेल्वे पोलिसांनी सतर्कता बाळगण्याची आवश्यकता आहे. कारण ११ ऑगस्ट २०१२ रोजी रझा अकादमीच्या मोर्चासाठी राज्यभरातून मुसलमान हे लोकलमधूनच आझाद मैदानापर्यंत पोहचले होते आणि हजारोंच्या संख्येने जमलेल्या मुसलमानांना तिथे दंगल केली.

(हेही वाचा एमआयएमचा मोर्चा चिघळण्याची शक्यता, आझाद मैदान दंगलीची पुनरावृत्ती?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.