‘ठाकरे कुटुंबीयांबाबत बोलायचे नाही ठरवतो पण…’, शिंदे गटाचा ठाकरेंवर हल्लाबोल

91

राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर उद्धव ठाकरे गटाकडून शिंदे गटावर जोरदार टीका करण्यात येत आहे. त्यातच आता फॉक्सकॉन-वेदांता प्रकल्प हा महाराष्ट्रातून गुजरातला गेल्यामुळे उद्धव ठाकरे गटाकडून सरकारवर आरोप करण्यात येत आहेत. त्याचबाबत आता शिंदे गटाचे प्रवक्ते आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला आहे.

हे किती वेळा कार्यालयात गेले?

आम्ही राज्याच्या विकासासाठी दिवस-रात्र काम करत आहोत. आता ते गल्लीबोळात जाऊन फिरुन विकासाच्या गोष्टी करत आहेत. पण मंत्रालयातील रेकॉर्ड काढले तर हे किती वेळा आपल्या कार्यालयात गेले ते कळेल, मग यांच्याकडून काय विकास होणार? त्यांच्या अशा बोलण्याने मनाला वेदना होतात, असे केसरकर यांनी म्हटले आहे.

बदनामी करायचा प्रयत्न

ठाकरे कुटुंबीयांबाबत बोलायचं नाही असं आम्ही ठरवलं होतं. पण काहीही बोलायचं, आपण काम करू शकलो नाही पण जे काम करत आहेत त्यांची बदनामी करायची हे काही योग्य नाही, असे म्हणत दीपक केसरकर यांनी ठाकरे गटाबाबतची नाराजी व्यक्त केली आहे.

(हेही वाचाः ‘100 खोके घेण्याची सवय ठाकरेंनाच, त्यांची पोलखोल करणार’, रामदास कदमांचा थेट इशारा)

तरुणांना भडकवण्याचे राजकारण

तुम्ही येणा-या प्रकल्पांना विरोध करता. यापेक्षा तिप्पट मोठे प्रकल्प हे महाराष्ट्रात येऊ पाहत आहेत त्याला विरोध करण्यात तुम्हीच आघाडीवर आहात. त्यामुळे हे राजकारण थांबवून राज्यातील तरुणांचा आणि मराठी माणसांचा विचार करा. लोकांना भडकवायचं आणि सत्तेत येण्याचा प्रयत्न करायचा. पण महाराष्ट्रातील तरुण पिढी आता जागृत झाली आहे. त्यामुळे तुमच्या अशा भडकवण्याचा त्यांच्यावर काहीही परिणाम होणार नाही. ते राज्याच्या विकासासाठी आमच्या सोबत असल्याचेही केसरकर यांनी यावेळी म्हटले आहे.

(हेही वाचाः ‘मी शेट्टी नाव लावून घ्यायला तयार, त्यामुळे तरी…’, फडणवीसांच्या मिश्कील विधानाने पिकला हशा)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.