‘ठाकरे आडनाव काढलं तर 50 लोकही मागे उभे राहणार नाहीत’, शहाजी बापूंची टीका

95

शिंदे गटातील आमदारांच्या विरोधात आता उद्धव ठाकरे यांची शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे. शिवसंवाद यात्रेदरम्यान आदित्य ठाकरे हे प्रत्येक जिल्ह्यात जाऊन शक्तिप्रदर्शन करत असताना दिसत आहेत. तसेच ते शिंदे गटातील आमदारांवर जोरदार टीका देखील करत आहेत. त्यालाच आता शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे.

आदित्य ठाकरे हे बाळासाहेबांचे नातू या नात्याने महाराष्ट्रात फिरत आहेत. जर ठाकरे आडनाव काढले तर 50 लोक देखील यांच्या मागे उभे राहणार नाहीत, अशा शब्दांत शहाजी बापू पाटील यांनी आदित्य आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

ठाकरी भाषा शोभत नाही

आदित्य ठाकरे हे लोकनेते म्हणून नाही तर बाळासाहेब ठाकरे यांचे नातू या नात्याने महाराष्ट्रात फिरत आहेत. आम्ही आजही बाळासाहेबांच्या कुटुंबाचा सन्मान करतो. ठाकरी भाषा ही केवळ बाळासाहेबांना शोभून दिसायची ती उद्धव आणि आदित्य ठाकरे यांना शोभत नाही. जर ठाकरे आडनाव काढलं तर आदित्य यांच्यामागे 50 लोकही उभे राहणार नाहीत, अशी टीका शहाजी बापू पाटील यांनी केली आहे.

आमचं चिन्ह धनुष्यबाणच

आदित्य ठाकरे यांच्यासारख्या लहान पोरानं गद्दार म्हणत टीका करणं योग्य नाही. आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या माणसांशी आदरानं बोलायचं असतं हे शिकवलं नाही का?, असा सवालही शहाजी बापू पाटील यांनी केला आहे. आगामी काळात निवडणुका येतील तेव्हा सगळेच मैदानात उतरणार आहेत. तेव्हा आमचा फॉर्म हा धनुष्यबाणाच्या चिन्हाचा असेल. उद्धव ठाकरेंनी ढाल-तलवार निशाण म्हणून घ्यावी, असा खोटक टोलाही शहाजी बापू पाटील यांनी लगावला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.