काँग्रेसमध्ये मुंबईत पडतेय उभी फूट?

97

राज्यात महाविकास आघाडीमध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आदी घटक पक्षांचा समावेश असला तरी यापूर्वीच्या सरकारने घेतलेला निर्णय आता या घटक पक्षांपैकी एक असलेल्या काँग्रेसमुळेच शिंदे-फडणवीस सरकारने बदलला. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये मोठी फूट तर पडलीच असून काँग्रेसमध्येही उभी फूट पडल्याचे यावरून दिसून येत आहे. काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप हे असताना माजी मुंबई अध्यक्ष व माजी खासदार मिलिंद देवरा यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यामुळे देवरा यांच्या गटाची मागणी विचारात घेऊन शिंदे सरकारने निर्णय घेत तत्कालिन महाविकास आघाडी सरकारलाच धक्का दिल्याचे बोलले जात आहे.

काँग्रेसमध्येही उभी फूट

दक्षिण मुंबईतील माजी खासदार मिलिंद देवरा यांनी मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देत पक्षापासून अलिप्त राहण्यास सुरुवात केली. पण तेव्हापासून सक्रीय नसलेले मिलिदा देवरा यांनी मागील आठवड्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवून २३६ प्रभार रचना आणि त्यांचे सिमांकन तसेच आरक्षण सोडतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत या प्रकरणाकडे सरकारचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. मिलिंद देवरा यांच्यासह आमदार अमिन पटेल, झिशान सिद्दीकी, माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांच्यासह आरक्षणात प्रभागच केलेले माजी नगरसेवक आदींच्या शिष्टमंडळाने देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीच्या दुसऱ्याच दिवशी मंत्रीमंडळाच्या बैठकीत यापूर्वीच्या मविआ सरकारने घेतलेल्या २३६ प्रभागांचा निर्णय बदलून जुन्याच पध्दतीने २२७ प्रभाग कायम ठेवण्याचा निर्णय घेतला.

( हेही वाचा : अधिवेशनाची तयारी : मंत्रिमडळ विस्ताराआधीच संभाव्य मंत्र्यांकडून खात्यांचा अभ्यास सुरू)

महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेस पक्ष सहभागी असला तरी मुंबई महापालिकेच्या प्रभाग रचना आणि त्यानंतरच्या प्रभाग आरक्षणाबाबत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप आणि तत्कालिन विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी जाहीर पत्रकार परिषदेत तीव्र नाराजी व्यक्त केली होती तसेच न्यायालयातही दाद मागितली होती. परंतु दुसऱ्या आरक्षणानंतर तर काँग्रेसच्या नगरसेवकांना याचा फटका बसल्याने अखेर मुंबई काँग्रेस अध्यक्षांऐवजी माजी मुंबई अध्यक्ष व माजी खासदार मिलिंद देवरा यांनी काँग्रेसच्या काही नगरसेवकांसह आमदारांचे नेतृत्व करत त्या शिष्टमंडळासह उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली. परंतु हे शिष्टमंडळ उपमुख्यमंत्र्यांना भेटायला गेल्यानंतर मुंबई काँग्रेसच्या कार्यालयात पक्षाचे अध्यक्ष बसून होते. भाई जगताप यांनी या सरकारला भेटण्याची इच्छा न दाखवल्याने मिलिंद देवरा यांनी पुढाकार घेतला. त्यामुळे काँग्रेसमध्ये देवरा गट पुन्हा एकदा सक्रीय होताना दिसत असून काँग्रेसमध्ये उभी फुट पडतेय की काय असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.