लोकलसाठी भाजप घेणार रेल्वे इंजिनाची साथ?

रेल्वे इंजिनात बसून, भाजप आता लोकल ट्रेनच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडीला धक्का देण्याच्या तयारीत आहे का?

78

शिवसेनेसोबत काडीमोड घेतल्यानंतर भाजप आपल्या नव्या मित्राच्या शोधात आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजपला आपला हा नवा भिडू सापडला असल्याच्या चर्चा जोरदार रंगू लागल्या आहेत. त्याच मित्राच्या रेल्वे इंजिनात बसून, भाजप आता महाविकास आघाडीला लोकल ट्रेनच्या मुद्द्यावरुन धक्का देण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे.

एप्रिल महिन्यापासून सर्वसामान्य मुंबईकरांसाठी लोकल बंद असून, आता जनता त्रस्त झाली आहे. मात्र आता याच लोकलच्या मुद्द्यावरुन मनसे आणि भाजपचे सूर जुळल्याचे पहायला मिळत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकल सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले. त्यानंतर भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी देखील पत्रकार परिषद घेत लोकल सुरू करावी, अशी मागणी केली आहे.

(हेही वाचाः भाजपला सापडला नवा भिडू, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकत्र येणार?)

तर मुंबईकरांचा सविनय नियमभंग

मुंबईतील सामान्य नोकरदार, कष्टकऱ्यांना उपनगरीय प्रवासाची परवानगी न देणाऱ्या ठाकरे सरकारला धडा शिकवण्यासाठी सामान्य मुंबईकर २ ऑगस्टपासून सविनय नियमभंग करत लोकल प्रवास सुरु करतील, असा इशारा भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी गुरुवारी दिला. मुंबईतील प्रवासाच्या सुविधेबाबत ठाकरे सरकारकडे धोरण नसल्याने सामान्य माणसाचे अतोनात हाल होत आहेत. सामान्य माणसाला उपनगरीय प्रवासास परवानगी देण्यास हरकत नसल्याचे केंद्र सरकारने दोन आठवड्यांपूर्वीच स्पष्ट केले. असे असताना राज्य सरकार सामान्य माणसाला उपनगरीय रेल्वे प्रवासास परवानगी देण्याच्या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष करत आहे.

(हेही वाचाः ‘नाहीतर माझा पक्ष आंदोलन सुरू करेल…’ राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र)

टाळेबंदीबाबतच्या राज्य सरकारच्या धरसोडपणामुळे जनतेचे जगणे अगोदरच मुश्कील झाले आहे. सामान्य माणसाला लोकल प्रवासास परवानगी द्या, अन्यथा प्रवास खर्चापोटी 5 हजार रुपये भत्ता द्या, या भाजपाने केलेल्या मागणीकडे राज्य सरकारने दुर्लक्ष केले. वैतागलेला सामान्य माणूस आघाडी सरकारच्या निषेधार्थ मोफत लोकल प्रवास करुन सविनय नियमभंग आंदोलन करेल, असे केशव उपाध्ये म्हणाले.

राज ठाकरेंनी दिला आंदोलनाचा इशारा

महाराष्ट्र सरकारनं निर्बंध शिथिल करण्यासाठी आणि मुख्य म्हणजे मुंबईची लोकल सेवा सुरू करण्यासाठी आता तातडीनं पावले उचलावीत. सर्वसामान्य माणसानं आत्तापर्यंत खूप सहन केलं आणि त्याची सहन करण्याची क्षमता आता संपत चालली. त्यामुळे आता यापुढे सरकारकडून काही सकारात्मक उपाय केले गेले नाहीत, तर कडेलोट होईल. त्या परिस्थितीत माझा पक्ष मुंबईकरांसोबत तर उभा राहीलच, पण लोकल प्रवास तातडीनं सुरू करण्यासाठी आंदोलन सुरू करेल, असा इशारा राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रातून दिला आहे.

(हेही वाचाः मुंबईकरांना दिलासा नाहीच, कॅबिनेट बैठक लोकल निर्णयाविनाच!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.