MNS चा हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न; बांगलादेशींवर कारवाई करण्याविषयी मौन

147
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर टीका करताना मुंबई महानगरपालिकेत २५ वर्षे सत्ता भोगूनही उबाठाने मराठी माध्यमाच्या शाळांपेक्षा हिंदी आणि उर्दू शाळांची संख्या वाढवली, असा आरोप करत उबाठा म्हणजे “भैय्यांची ढ टीम” आणि “पेंग्विन टीम” असे म्हटले. यावर शिवराज्याभिषेक समिती (रायगड) चे अध्यक्ष आणि मराठा महासंघाचे नेते सुनील पवार यांनी मनसे अशा प्रकारे मराठी अमराठी वाद निर्माण करून हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा कट रचत आहे. वास्तविक मनसेला घुसखोर बांगलादेशीयांचे वावडे वाटत नाही, त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी मनसे कोणतीही ठोस भूमिका घेत नाही.

संदीप देशपांडे काय म्हणाले? 

उबाठा उत्तर भारतीयांना मराठी शिकवण्याचे ढोंग करते, पण सत्तेत असताना मराठी शाळांची उपेक्षा करून हिंदी-उर्दू शाळांना प्रोत्साहन दिले. मराठी माणसाच्या हक्कांसाठी लढण्याचा दावा करणाऱ्यांनी मराठीला दुय्यम स्थान दिले. या दुटप्पी धोरणामुळे मराठी माणूस उपेक्षित राहिला आहे, असे मनसेचे (MNS) नेते संदीप देशपांडे म्हणाले.

सुनील पवार काय म्हणाले? 

मनसेने हिंदूंमध्ये फूट पाडण्याची वक्तव्य करण्यापेक्षा बांगलादेशी घुसखोर हिंदूंचा व्यवसाय ओरबाडून घेत आहेत, या मुद्याकडे लक्ष द्यायला हवे. मात्र तसे न करता मनसे आपल्याच लोकांमध्ये फूट पाडत आहे, हे दुर्दैवी आहे. हिंदू म्हणून सर्वांनी एकत्र यावे. मराठी माणसाने व्यवसाय करताना महानगरपालिकेने त्याला संरक्षण द्यावे. बाहेरून येणाऱ्या बांगलादेशींवर कडक कारवाई करावी. आपापसातील भांडणे सोडून मराठी माणसाने रोजगारासाठी एकत्र लढावे, बांगलादेशी रोहिंगे मोठ्या प्रमाणात मुंबईत येऊन व्यवसाय करत आहेत त्यांच्यावर देखील बंदी आली पाहिजे, असे शिवराज्याभिषेक समिती (रायगड) चे अध्यक्ष आणि मराठा महासंघाचे नेते सुनील पवार म्हणाले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.