राज ठाकरे पुण्यातूनच होणार औरंगाबादकडे रवाना

94

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे १ मे रोजी औरंगाबादमध्ये सभा घेणार आहेत. यासाठी पोलिसांनी परवानगी दिली. मात्र, काही अटी व शर्तीही लादल्या आहेत. मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर रविवारी हा सोहळा पार पडणार आहे. यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते दाखल होणार आहेत.

मनसेचे कार्यकर्ते करणार मोठे शक्तिप्रदर्शन

राज ठाकरे यांची औरंगाबाद सभा सर्वाधिक चर्चेची ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या सभेआधी उत्तर प्रदेशात मशिदींवरील भोंग्यांवर कारवाई झाली आहे. तर राज्यातील अन्य पक्षांचे नेते सध्या हनुमान चालिसा पठणाचे विषय चघळत आहेत. त्यामुळे ठाकरे यांच्या मशिदींवरील भोंग्यांच्या मागणीचे पडसाद उमटत असल्याचे स्पष्ट झाले आहे. औरंगाबादच्या सभेला जाण्यापूर्वी राज ठाकरे शुक्रवारी सायंकाळी चार वाजता पुण्यात येणार आहे. यानंतर ३० एप्रिल रोजी सकाळी ते औरंगाबादकडे रवाना होणार असल्याचे सांगितले जात आहे. यावेळी राज ठाकरे यांच्या ताफ्यात शंभराहून अधिक चारचाकी गाड्या असतील. ठाकरे यांच्या सभेआधी मनसेचे कार्यकर्ते मोठे शक्तिप्रदर्शन करणार आहेत. पुण्यातून हजारो कार्यकर्ते राज ठाकरेंसोबत औरंगाबादला जाणार आहेत.

प्रत्युत्तर सभेची मनसेकडून जय्यत तयारी सुरू

औरंगाबादेतील मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर मनसेच्या कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांकडून जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. पोलिसांकडून देखील या सभेच्या दिवसाकरता बंदोबस्ताचा प्लान तयार करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. औरंगाबादेत १ मे रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रत्युत्तर सभा होणार आहे. प्रत्युत्तर सभेची मनसेकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे. औरंगाबाद शहरात सगळीकडे मनसेचे झेंडे लावण्याची आणि कार्यक्रम पत्रिका घरोघरी वाटपाची मनसैनिकांनी तयारी सुरू केली आहे.

राज ठाकरे या अटी-शर्तींचे पालन करणार?

(हेही वाचा – राज ठाकरेंच्या औरंगाबाद सभेची खास निमंत्रण पत्रिका तयार; भगवे वस्त्र, हनुमान अन्…)

१ ) मे रोजी महाराष्ट्र दिन असल्यानं धर्म, प्रांत, वंश ,जात यावरून कोणतेही विधान करू नये

२ ) सामाजिक सलोखा बिघडेल, असे कोणतेही वर्तन करण्यात येऊ नये

३ ) सभेपूर्वी आणि नंतर वाहन रॅली किंवा मिरवणूक काढता येणार नाही

४ ) लहान मुले, महिला, वृद्ध यांची सुरक्षितता राहील याची दक्षता घ्यावी

५ ) सभेच्या ठिकाणी असभ्य वर्तन करण्यास परवानगी नाही

६ ) इतर धर्मियांच्या भावना दुखावणार नाहीत, याची दक्षता घ्यावी.

७ ) सभेदरम्यान कोणत्याही प्राण्याचा वापर करता येणार नाही

८ ) व्यक्ती किंवा समुदायाचा अनादर होणार नाही याची दक्षता घ्यावी

९ ) सभेला येणार्‍या लोकांनी घोषणा नारेबाजी देऊ नयेत, जेणेकरून सामाजिक वातावरण बिघडेल

१० ) वाहन पार्किंगचे नियम पाळावे

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.