आता एसटीचे कर्मचारी मागतायत स्वेच्छा मरणाची परवानगी…

94

राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचा-यांचा संप मागील अडीच महिन्यांपासून सुरू आहे. अजूनही कर्मचारी काही संख्येने संपावर आहेत. विलीनीकरणाच्या मागणीवर अजून निर्णय होत नाही, त्यामुळे आता कर्मचा-यांनी थेट स्वेच्छा मरणाची इच्छा प्रकट केली आहे. तसे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे.

पाथर्डी आगारातील कर्मचा-यांचे पत्र

राज्य परिवहन विभागाच्या पाथर्डी आगारातील एसटी कर्मचार्‍यांनी पाथर्डीच्या तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना हे पत्र पाठवले आहे. एसटी कर्मचा-यांच्या संपामुळे राज्यभरातील प्रवाशांचे हाल होत आहे, तसेच एसटी कर्मचारीही तणावाखाली आले आहेत. संप काळात 67 एसटी कर्मचार्‍यांनी आत्महत्या केली आहे. आमच्याही मनात सतत आत्महत्येचा विचार येत आहे. मात्र, आत्महत्या करणे हा गुन्हा आहे. त्यामुळे सरकारनेच आम्हाला स्वेच्छा मरणाची परवानगी द्यावी, अशी मागणी पाथर्डी येथील एसटी डेपोतील कर्मचार्‍यांनी केली आहे.

(हेही वाचा पंतप्रधानांच्या सुरक्षेत नक्की कुठे त्रुटी राहिली? जाणून घ्या माजी पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची मते)

सेवाज्येष्ठतेनुसार पदनिहाय वेतन श्रेणी देण्याचा मागणी

मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आलेल्या पत्रात म्हटले आहे की, राज्याचे प्रमुख या नात्याने मुख्यमंत्र्यांनी आमच्या मागण्यांकडे लक्ष घालावे. एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्यात यावे, राज्य सरकारी कर्मचार्‍यांप्रमाणे सेवाज्येष्ठतेनुसार पदनिहाय वेतन श्रेणी देण्यात यावी, मागण्या पूर्ण करता येत नसतील, तर आम्हाला स्वेच्छा मरणाची तरी परवानगी द्यावी, अशी मागणीही कर्मचार्‍यांनी केली आहे. एसटी कर्मचार्‍यांची मानसिक स्थिती योग्य राहिलेली नाही. आम्ही सतत तणावाखाली वावरत आहोत. राज्यातील इतर शासकीय कर्मचार्‍यांच्या तुलनेत एसटी कर्मचारी यांची आर्थिक स्थिती वाईट आहे, असे कर्मचा-यांचे म्हणणे आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.