राज्यात ओमायक्राॅनचा शिरकाव, जनतेची सुरक्षा वाऱ्यावर

82

कोरोनाच्या ओमायक्राॅन विषाणूचा शिरकाव भारतात झाल्यानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रातच त्याचा फैलाव वेगाने वाढत असल्याचे निष्पन्न होत असून, देशातील सर्वाधिक ओमायक्राॅन रुग्ण महाराष्ट्रात असल्याने या फैलावापासून बचावासाठी कोणत्या उपाययोजना केल्या आहेत, याची माहिती राज्य सरकारने जनतेस दिली पाहिजे, अशी मागणी प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे. कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत जनतेशी दूरसंवाद साधणारे मुख्यमंत्री ठाकरे प्रकृतीच्या कारणामुळे दैनंदिन सरकारी कामकाजापासून दूर असल्याने सरकारमध्ये सावळा गोंधळ माजला असून, पुन्हा एकदा जनतेच्या सुरक्षेचा मुद्दा वाऱ्यावर पडला आहे, असे ते म्हणाले.

सत्तेवरील पक्ष राजकारणात रमलेय

ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण महाराष्ट्रात आढळल्यानंतरही राज्याच्या कोरोना टास्क फोर्सकडून कोणत्याच उपाययोजनांची माहिती जनतेस दिली गेली नाही. आरोग्यमंत्री राजेश टोपे हे देखील या नव्या फैलावासंदर्भात मौन धारण करून बसले आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेदरम्यान मुख्यमंत्री ठाकरे समाजमाध्यमांद्वारे तरी जनतेस मार्गदर्शन करत होते. पण आता मात्र राज्याच्या मंत्रिमडळात मनमानी कारभाराची स्पर्धा सुरू आहे. सरकारी पदांच्या परीक्षांमधील भ्रष्टाचार चव्हाट्यावर येत आहेत. एसटी कामगारांच्या संपाचा गुंता सोडविण्याकडे सरकारचे दुर्लक्ष होत आहे आणि सत्तेवरील पक्ष मात्र, राजकारणात रमले आहेत. कोरोना काळातील आरोग्य यंत्रणेच्या असंख्य त्रुटींमुळे मृत्युसंख्या वाढली होती. उपाययोजनांच्या नावाखाली कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे. ऑक्सिजनचा तुटवडा, उपचार केंद्रांतील भ्रष्टाचार, औषध खरेदीतील उधळपट्टी अशा अनेक तक्रारींमुळे कोरोनाच्या उद्रेकात राज्यात मोठ्या प्रमाणावर प्राणहानी झालेली असताना, नव्या घातक ओमायक्राॅनच्या वाढत्या फैलावाकडे सरकार दुर्लक्ष करत आहे, असा आरोपही उपाध्ये यांनी केला.

(हेही वाचा हिंदू व्होट बँक, हिंदुत्व आणि राहुल गांधी)

उपाध्यांचे टीकास्त्र

मुख्यमंत्री कारभारात लक्ष घालत नसल्याने, महाराष्ट्राची जनता वाऱ्यावर पडली आहे. नव्या विषाणूचे संकट वाढत असताना, तातडीने उपाययोजना आखणे ही सरकारची जबाबदारी असते. मात्र, फैलाव वाढत असतानाही सरकारकडून काहीच हालचाल होत नसल्याबदद्ल उपाध्ये यांनी आश्चर्य व्यक्त केले. मुख्यमंत्र्यांचा धाक राहिलेला नसल्यानेच मंत्रिमंडळाची मनमानी सुरू असून, त्याचा फटका जनतेस बसत आहे. त्यामुळे वेळीच सावध होऊन सरकारने ओमायक्राॅनचा फैलाव रोखण्याच्या ठोस उपाययोजना जाहीर कराव्यात, अशी मागणीही त्यांनी केली. या नव्या संकटात टाळेबंदीसारख्या उपाययोजना पुन्हा जारी होतील का, याबद्दलही जनतेच्या मनात भीती आहे. तसे झाल्यास रोजगाराच्या समस्या पुन्हा उग्र होतील या चिंतेने जनतेस ग्रासले आहे. जनतेच्या अशा शंकांचे निरसन करण्याची जबाबदारी मुख्यमंत्री या नात्याने उद्धव ठाकरे दूरदृश्य प्रणालीतून तरी पार पाडत होते. आता मात्र, सरकार पुरते गोंधळल्याने जनतेस वाली राहिलेला नाही, अशी टीका उपाध्ये यांनी केली. मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीस लवकर आराम पडावा व त्यांनी भरकटलेल्या सरकारला रुळावर आणून जनतेस दिलासा द्यावा अशी सदिच्छाही व्यक्त केली.

 ( हेही वाचा :अरेरे…थर्टी फस्ट घरातच साजरा करावा लागणार! )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.