लढण्याआधीच माघार! मुंबई विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार

130

मुंबई महापालिकेतून विधान परिषदेत दोन सदस्यांच्या जागेसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून सुनील शिंदे आणि भाजपकडून राजहंस सिंह यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर माजी नगरसेवक सुरेश कोपरकर यांनीही काँग्रेस पुरस्कृत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरत चुरस निर्माण केली होती. पण, सुरेश कोपरकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे मुंबईतील विधान परिषदेच्या दोन जागा आता बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा

अपक्ष उमेदवार सुरेश कोपरकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे भाजपचे राजहंस सिंग तर, शिवसेनेचे सुनील शिंदे यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. भाजपने एका अमराठी उमेदवाराला उमेदवारी दिली. पण काँग्रेस मराठी उमेदवाराच्या पाठिशी राहणार असून याबाबत पक्षाचे वरिष्ठ नेते हे पक्षाचे ज्येष्ठ माजी नगरसेवक असलेल्या कोपरकर यांना निवडून आणण्यासाठी रणनिती आखत असल्याचे सांगितले जात असतानचं, कोपरकर यांनी अर्ज मागे घेतला आहे. दुसरीकडे सुनिल शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांच्यासाठी विधानसभा निवडणुकीत वरळी मतदारसंघ सोडला होता आणि त्यांना विधान परिषदेची आमदारकी दिली जाईल, असे आश्वासनं देण्याच आले होते. अखेर सेनेकडून सुनील शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली.

( हेही वाचा : काँग्रेसला फक्त करायचीय हवा)

दबावतंत्र राबवण्यासाठी भरला अर्ज

दरम्यान, सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार खासदार राजीव सातव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपने माघार घेत ही निवडणूक बिनविरोध केली होती. तसेच सातव यांच्या पत्नीचीही विधान परिषदेवर बिनविरोध निवड झालेली आहे. त्यामुळे काँग्रेसने दबावतंत्र राबवण्यासाठी आपल्या उमेदवाराला अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उभे केले होते. त्यामुळेच कोपरकरांनी अपेक्षेप्रमाणे अर्ज मागे घेतल्याचे बोलले जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.