शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी नागपूरमध्ये पत्रकार परिषद घेत, शिवसेना मंगळवारपासून शिवसंपर्क अभियानाची सुरुवात करत असल्याचे सांगितले आहे. शिवसंवाद यात्रा या अभियानातंर्गत शिवसेनेचे खासदार मंगळवारपासून विदर्भ आणि मराठवाड्याच्या दौ-यावर असणार आहेत. या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपावर हल्ला चढवला आहे. तसेच, खोटे पुरावे दाखवणे म्हणजे बाॅम्ब नाही, असं म्हणत त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
…तर त्यांना जनाब म्हणणार का?
एमआयएमकडून (AIMIM) महाविकास आघाडीला प्रस्ताव आला आहे. त्यानंतर भाजपकडून शिवसेनेवर ‘जनाब’ अशी टीका केली जात आहे. त्यावरुन संजय राऊत यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मागील काही काळात मुस्लिमांबाबत केलेले वक्तव्य लक्षात घेता, भाजपही त्यांना आणि संघाला जनाब सेना संबोधणार का असा उलट प्रश्न भाजपला केला आहे.
( हेही वाचा: महागाईने गाठला कळस! आता गॅस सिलिंडरच्या किमतीतही झाली मोठी वाढ )
केंद्रीय यंत्रणा म्हणजे खुळखुळा
मागच्या काही दिवसांपासून शिवसेना- भाजपामध्ये आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. एमआयएमने शिवसेना आणि महाविकास आघाडीसोबत चर्चेची तयारी दाखवल्यानंतर भाजपने शिवसेनेवर टीकेची धार आणखी तीव्र केली आहे. महाराष्ट्र कोणात्याही परिस्थितीत दिल्लीसमोर झुकणार नाही. केंद्रीय यंत्रणा या भाजपचे कार्यालय झाल्याचेही राऊत यावेळी म्हणाले. भाजपने केंद्रीय तपास यंत्रणांचा खुळखुळा केला असून, विरोधकांना हा खुळखुळा वाजवून भीती दाखवली जात असल्याचे, टीकास्त्र संजय राऊत यांनी सोडले.