आता औरंगाबादचे नामकरण प्रशासकीय पातळीवर कसे होणार? फडणवीसांनी सांगितली पुढची प्रक्रिया 

146
औरंगाबादचे नामकरण छत्रपती संभाजी नगर करण्याचा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माविआचे सरकार कोसळण्याआधी शेवटच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला होता. मात्र या निर्णयाला अधिकृत पाया नव्हता म्हणून त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने ठाकरे सरकारचा निर्णय रद्द करून पुन्हा नव्याने नामांतराचा निर्णय घेतला आणि तो केंद्रात मंजुरीला पाठवला. केंद्राने शुक्रवार, २४ फेब्रुवारी रोजी याला मंजुरी दिली. मात्र त्यानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी नामकरण केवळ शहराचे होणार कि जिल्ह्याचे असा प्रश्न उपस्थित करत संभ्रम निर्माण केला. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासकीय पातळीवर नामकरण कसे होणार यांची प्रक्रिया सांगितली.

काय म्हणाले फडणवीस? 

केंद्र सरकारची मंजुरीची प्रक्रिया पूर्ण झाली की, आधी सामान्य प्रशासन विभाग अधिसूचना काढते, तेव्हा शहरांची नावे बदलतात. ही अधिसूचना जारी झाली आहे, त्यानुसार औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’ आणि उस्मानाबादचे ‘धाराशिव’ असे नामकरण झाले आहे. त्यानंतर महसूल व वन विभाग तसेच नगरविकास विभाग अधिसूचना जारी करेल, तेव्हा संपूर्ण जिल्ह्याचे, तालुक्याचे, महापालिका आणि नगरपालिकेचे सुद्धा नाव बदलेल. दोन्ही जिल्ह्यांसंदर्भात याचीही प्रक्रिया सुरू झाली आहे. आम्ही जेव्हा काही करतो तेव्हा ते पूर्णच करतो. अर्धवट काहीच ठेवत नाही!

काय म्हणाले होते अंबादास दानवे? 

हे नामांतर फक्त संभाजीनगर शहराचे आहे की संपूर्ण जिल्ह्याचे, यावर केंद्राने स्पष्टीकरण देणे अपेक्षित आहे. औरंगजेबाचे नाव मिटवायचे असेल तर जिल्हा पण संभाजीनगर असावा.. ता. ‘छत्रपती संभाजीनगर जिल्हा औरंगाबाद’, असे यापुढे लिहावे लागेल का हे पण सांगा.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.