राणेंमुळे भाजप दहाफूट मागे जाईल! संजय राऊतांचा इशारा

भाजप जर राणेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून वार करत असेल, तर आमच्याकडेही अनेक खांदे आहेत. आयुष्यभर आम्ही खांदेच देत आलो आहोत, म्हणजे राजकीय खांदे देत आलो आहोत, असेही संजय राऊत म्हणाले.

115

नारायण राणे यांची सातत्याने जीभ घसरत आहे. त्यामुळे राणे आणि त्यांचा सध्याचा पक्ष भाजप कारण उद्या त्यांचा पक्ष भाजप असेल याची खात्री देता येत नाही, म्हणून सध्याचा त्यांचा पक्ष भाजपने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. कारण भाजपाला त्यांची चूक समजल्याशिवाय राहणार नाही. जर तुम्ही राजकारणात संयम पळाला नाही, तर महाभारत आणि रामायणात जे झाले तसे या पक्षाचा अहंकाराने घात होईल, भाजप दहा फूट लांब जाईल आणि शिवसेना पुढे जाईल, असा इशारा शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिला.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा अवमानकारक उल्लेख केल्याप्रकरणी नाशिक येथे पहिला गुन्हा दाखल झाला, त्यानंतर राणे यांना अटक झाली, त्यानंतर राज्यभर वाद निर्माण झाला. त्यावेळी नाशिक येथील भाजपाच्या कार्यालयावर शिवसैनिकांनी दगडफेक केली. त्या शिवसैनिकांचे कौतुक करण्यासाठी संजय राऊत नाशिक येथे आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

(हेही वाचा : नारायण राणेंचे आता सिंधुदुर्गात धुमशान!)

आमच्याकडे अनेक खांदे आहेत!

भाजपने आमचा वैचारिक मतभेद करावा, पण तुम्ही वैर घेऊन वागत असाल तर सहन करणार नाही. आम्ही राणे यांना भाजपचे मानत नाही, पण भाजप जर राणेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून वार करत असेल, तर आमच्याकडेही अनेक खांदे आहेत. आयुष्यभर आम्ही खांदेच देत आलो आहोत, म्हणजे राजकीय खांदे देत आलो आहोत. चिखल आम्हालाही टाकता येतो, पण तो चिखलात दगड फेकला तर आमच्यावर उडेल, आम्ही सत्तेत आहोत आपल्याला संयम सोडता येत नाही, पण म्हणून आम्ही सगळे सहन करणार नाही. राज्यात प्रदीर्घ काळ शिवसेनेचा मुख्यमंत्री राहील. तुम्ही पडाल पण सरकार पडणार नाही, तो काय झाडावरून पडणारा आंबा आहे का? हे तीन पक्षांचे सरकार आहे, आम्ही आघाडीचा धर्म पळत आहोत, शिवसेना हे वादळ आहे, त्यात पाचोळ्यासारखे उडून जाल, असेही राऊत म्हणाले .

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.