केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांबद्दल अपशब्द वापरल्यामुळे त्यांना जेवणाच्या ताटावरून उठवून तुरुंगात टाकण्यात आले होते. त्यावेळेस तुमचं व्यक्ती स्वातंत्र्य कुठे होतं, असा सवाल शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी उपस्थित केला आहे.
( हेही वाचा : मेटा सीईओ मार्क झुकरबर्गसह अनेक युजर्सचे फॉलोवर्स झाले कमी, काय आहे कारण?)
पंतप्रधान, राष्ट्रपती, मुख्यमंत्र्यांची नक्कल केल्यामुळे उद्धव ठाकरे गटातील काही नेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. मात्र, हा आमच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला असल्याचा आरोप त्यांच्याकडून केला जात आहे. या आरोपांना शिंदे गटाच्या वतीने बुधवारी म्हस्के यांनी प्रत्युत्तर दिले.
महाराष्ट्राला ही दिशा तुम्हीच दाखवली…
म्हस्के म्हणाले, कालच्या मेळाव्यामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पंतप्रधानांची नक्कल करण्यात आली. देशातील पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपतीलाही यांनी सोडले नाही. मग आता मागाहून व्यक्तिस्वातंत्र्याच्या गप्पा का मारत आहात? केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करताना तुम्ही व्यक्ती स्वातंत्र्य विसरला होतात का, असा सवालही म्हस्के यांनी केला. महाराष्ट्राला ही दिशा तुम्हीच दाखवलेली आहे आणि आपण दाखवलेल्या दिशेनेच आपल्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत. त्यामुळे आता आरडाओरड करण्याची गरज नाही, असे ते म्हणाले.
Join Our WhatsApp Community