मोहित भारती यांची बदनामी केल्यामुळे मलिकांना अटक

115

क्रूझ पार्टीवरील कारवाईबाबत भाष्य करताना एनसीपीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी भारतीय युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष मोहित भारती यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यावर भारती यांनी मलिक यांच्याविरोधात बदनामीचा दावा दाखल केला. याप्रकरणी मलिक यांना अखेर सोमवारी अटक करण्यात आली. त्यानंतर लगेच १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला.

मलिकांचे वक्तव्य प्राथमिकदृष्ट्या बदनामीकारक असल्याचे स्पष्ट

९ ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषदेत बोलताना नवाब मलिक यांनी ‘मुंबईतील क्रूझ पार्टीवर एनसीबीने कारवाई केली, तेव्हा मोहित भारती यांचे मेव्हणे रिषभ सचदेव यांच्यासह २ जणांना सोडून देण्यात आले होते’, असे म्हटले होते. त्यावर भारती यांनी ‘त्या कारवाईत शाहरुख खानच्या मुलासह अनेकांना अटक करण्यात आली होती. यामध्ये जाणीवपूर्वक आपल्या मेव्हण्याच्या नावाचा उल्लेख करून आपली बदनामी करण्यात आली आहे’, असे सांगत भारती यांनी मलिक यांना कायदेशीर नोटीस पाठवली होती. त्यानंतर ११ ऑक्टोबर रोजी दुसरी नोटीस पाठवली. तरीही मलिक बदनामीकारक भाष्य करत होते, म्हणून अखेर भारती यांनी मलिकांविरोधात दंडाधिकारी न्यायालयात बदनामीचा दावा दाखल केला. न्यायालयाने मलिकांना ८ नोव्हेंबर रोजी नोटीस पाठवून न्यायालयात हजर राहण्याचा आदेश दिला होता. न्यायालयाला प्राथमिकदृष्ट्या मलिकांचे वक्तव्य बदनामीकारक असल्याचे वाटले. सोमवारी मलिक न्यायालयात हजर राहिले, न्यायालयाने त्यांना १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला याप्रकरणाची पुढील सुनावणी ३० डिसेंबर रोजी होणार आहे.

(हेही वाचा मोदी युग आणि सावरकर युग एकच! देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.