जे वेटिंगवर आहेत, ते वेटिंगवरच राहतील! राणेंच्या ‘त्या’ विधानाला पवारांचे चोख उत्तर

ठाकरे सरकार मजबूत असल्याचा छुपा संदेशही त्यांनी विरोधकांना दिला आहे. 

93

राज्यातील पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी राष्ट्रवादीतर्फे पूरग्रस्तांना मदत जाहीर करतानाच त्यांनी अप्रत्यक्षपणे भाजप नेत्यांनाही शालजोडीतून हाणले आहे. हे सरकार कधी पडेल याची विरोधक वाट पाहत आहेत. पण त्यांना वेटिंगवरच राहावं लागेल, असं म्हणत त्यांनी नारायण राणे यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे. तसेच ठाकरे सरकार मजबूत असल्याचा छुपा संदेशही त्यांनी विरोधकांना दिला आहे.

काय म्हणाले पवार?

सरकारमध्ये समन्वयाचा अभाव आहे, सरकार आपली जबाबदारी पार पाडत नाही. जर सरकार चालवायला जमत नसेल तर आम्हाला द्या, आम्ही वेटिंगवरच आहोत, अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पूरग्रस्त भागांची पहाणी करताना प्रसारमाध्यमांना दिली होती. त्याला आता शरद पवार यांनी उत्तर दिले आहे. जे वेटिंगवर असतात त्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही, त्यांना वेटिंगवरच राहावं लागतं, अशा शब्दांत त्यांनी राणेंना कानपिचक्या दिल्या आहेत. तसेच हे सरकार स्थिर आहे, काळजी करण्याची गरज नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

(हेही वाचाः कोकण महापुरात तेव्हा कोकणचे ‘ते’ नेते होते घरात!)

नेत्यांनी दौरे टाळावेत

पूरग्रस्त भागांची पहाणी करण्यासाठी अनेक नेते दौरे करत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या भागांचा दौरा केला. पूरग्रस्त भागांतील परिस्थितीची माहिती घेण्यासाठी आणि लोकांना दिलासा देण्यासाठी त्यांना दौरे हे करावेच लागतात. पण इतर नेत्यांनी असे दौरे करुन गर्दी करू नये. तेथील लोकांना मदत करणे हे जास्त गरजेचे आहे. त्यामुळे आपल्या दौ-यांमुळे तेथील व्यवस्थेवर ताण पडणार नाही याची काळजी इतर नेत्यांनी घ्यावी, असे शरद पवार म्हणाले. त्यामुळे काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रविण दरेकर यांनी केलेल्या दौ-यावर पवारांनी अप्रत्यक्ष टीकाच केली आहे. आता राज्यपाल दौरा करत आहेत, त्यामुळे ते केंद्राकडे अतिरिक्त मदतीची मागणी करतील, अशी आशा आहे. असे शरद पवार म्हणाले.

(हेही वाचाः राज्य चालवायला द्या, आम्ही वेटिंगवरच आहोत! राणेंचा मुख्यमंत्र्यांना सल्ला)

काय म्हणाले होते नारायण राणे?

रविवारी पूरग्रस्त भागांचा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दौरा केला. त्यावेळी त्यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर निशाणा साधला. केंद्र सरकार राज्याला कायमंच मदत करत आहे, कोणतीही मदत बाकी ठेवत नाही. पण केंद्र सरकारकडे सारखीच मदत मागायची असेल, तर राज्य सरकार कशाला आहे? देऊन टाका राज्य केंद्राला चालवायला. इथे आम्ही वेटिंगवरचं बसलोय, असे देवेंद्र फडणवीसांकडे पाहून, मिश्किल हसत राणे यांनी राज्य सरकारवर टीका केली होती.

(हेही वाचाः याला जबाबदार मुख्यमंत्र्यांचा पायगुण! राणेंची बोचरी टीका)

राष्ट्रवादी करणार मदत

राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टकडून पूराचा फटका बसलेल्या 16 हजार कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंच्या किट्स पुरवण्यात येणार आहेत, अशी घोषणा शरद पवार यांनी केली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आरोग्य विभागाकडून 250 डॉक्टरांची टीम आवश्यक ठिकाणी जाऊन, औषधं आणि वैद्यकीय सेवा पुरवणार आहे. पूरग्रस्तांना भांडी, पांघरुण, मास्क आणि इतर जीवनावश्यक वस्तू पुरवण्यात येणार आहेत. येत्या दोन ते दिवसांत या सर्व वस्तूंचे वाटप केले जाणार असून, त्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची फौज तयार करण्यात आली आहे, असे पवार म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.