शरद पवार म्हणाले, “… त्याकरिता इतकं अस्वस्थ व्हायची गरज नाही”

98

सत्ता येते आणि जाते. त्याकरिता इतकं अस्वस्थ व्हायची गरज नाही. पण काही लोक फार अस्वस्थ आहेत. त्यांना दोष देता येत नाही. कारण निवडणुकांपूर्वीच ‘मी येणार येणार’ अशी घोषणा त्यांनी केल्या. मात्र ते घडू शकले नाही, त्यातून ही अस्वस्थता असते, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी देवेंद्र फडणसवींना लगावला. पुण्यात एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधताना पवार बोलत होते.

ही परंपरा यशवंतराव चव्हाण यांच्यापासून होती

महाराष्ट्रात यापूर्वी कधीच असे नव्हते. राज्यात अनेक वर्षे काम केले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी जाहीरपणे इतके मतभेद असायचे, की एकमेकांना शब्द वापरण्याबाबत आम्ही कधीच काटकसर केली नाही. परंतु, संध्याकाळी ते माझ्या किंवा मी त्यांच्या घरी जात असू. औरंगाबादमध्ये आमच्या सभा झाल्या तेव्हा विरोधकांवर तुटून पडलो. सभा संपल्यानंतर तिथले ज्येष्ठ नेते बापूसाहेब काळदाते किंवा अनंत भालेराव या सर्व व्यक्तींबरोबर आमची संध्याकाळ जायची आणि सभेत काय बोललो याचे स्मरणही व्हायचे नाही. ही परंपरा यशवंतराव चव्हाण यांच्यापासून होती. महाराष्ट्राच्या विधीमंडळात नसलो तरी पाहिले आहे की मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, आचार्य अत्रे, एस.एम जोशी हे विरोधी पक्षातले नेत्यांमधील चर्चा टोकाची असायची पण नंतर तिघेही एकत्र बसून राज्याच्या विकासावर चर्चा करायचे. दुर्देवाने, सध्याच्या राज्यातील राजकारणात या गोष्टी पाहायला मिळत नाहीत अशी खंतही पवारांनी व्यक्त केली.

(हेही वाचा – एसटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा दिला आंदोलनाचा इशारा! काय आहे तारीख?)

फडणवीसांकडून पवारांना प्रत्युत्तर

शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला होता. आता, देवेंद्र फडणवीस यांनीही पवारांना तितकेच खोचक उत्तर दिले आहे. सरकारं पाडणं, काँग्रेसबाहेर पडणं, पुन्हा काँग्रेसमध्ये जाणं, हे सर्व अस्वस्थतेशिवाय थोडंच होतं, त्यामुळे पवारांनी अस्वस्थतेवर बोलू नये. पुढे ते असेही म्हणाले की, जेव्हा गोष्टी जुन्या होतात, तेव्हा लोक विसरतात आणि सोईच्या गोष्टी लक्षात ठेवतात. कोणी सरकार पाडलं, मग पुन्हा काँग्रेसमध्ये कोण गेलं. मग पुन्हा काँग्रेसचं सरकार कुणी पाडलं, याचा इतिहास सर्वांना माहिती आहे. अशा प्रकारे सरकारं पाडणं, काँग्रेसबाहेर पडणं, पुन्हा काँग्रेसमध्ये जाणं, हे सर्व अस्वस्थतेशिवाय थोडंच होतं. कुणी स्वस्थ बसलाय आणि मॅच बघतो, तो थोडंस असं करेल. त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही. मी एकाच पक्षात आहे. माझा पक्ष सत्तेत येणारच आहे, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.