देशाच्या नागरिकांना आता फक्त सर्वांगीण प्रगती आणि आर्थिक विकास हवा आहे. एकमेकांचे हात हाती घेऊन ऐक्याच्या घोषणा देणारे आणि पायात पाय घालून पाडण्याची संधी शोधणारे विरोधक आता कालबाह्य झाले आहेत. विरोधक अविश्वास ठरावावर तोंडावर कसे आपटतात, हे गेल्या दोन दिवसांपासून सारा देश पाहत आहे. त्यामुळे संसदेतील अविश्वास ठरावावरील चर्चेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एनडीएच्या घटक पक्षांचे स्थान अधिक बळकट होईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी व्यक्त केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या विरोधात विरोधी पक्षाने आणलेल्या अविश्वास ठरावावर संसदेत वादळी चर्चा झाली. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी आज ट्विट करून विरोधकांवर निशाणा साधला आहे. जगभरात पंतप्रधानांच्या नेतृत्वाला जी मान्यता मिळत आहे, ती पाहून विरोधकांचा जळफळाट झाला आहे. देशातील जनतेने विरोधकांवर वारंवार अविश्वास दाखवला. २०१४ आणि २०१९ मध्ये सामान्य नागरिकांचा मोदी यांच्यावरील प्रगाढ विश्वास दिसून आला. २०२४ साली तो वृद्धिंगत होईल आणि याबाबत कुणाच्याही मनात शंका नाही, असा दावा शिंदे यांनी केला आहे.
(हेही वाचा PM Narendra Modi : विरोधकांचे अपशब्द माझ्यासाठी टॉनिक – पंतप्रधान मोदी)
देशभरात विश्वास गमावलेल्या विरोधी पक्षाने संसदेमध्ये अविश्वास ठराव मांडला आहे खरे तर या ठरावावर चर्चा घडवून विरोधक स्वतःचेच ‘वस्त्रहरण’ करून घेत आहेत. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकास आणि सुधारणांचा धडाका लावलेला आहे. त्यामुळे विरोधकांच्या छातीत धडकी भरली आहे. कॉंग्रेसच्या ५५-६० वर्षांच्या कालखंडात जेवढी विकासकामे झाली नाहीत, त्यापेक्षा अधिक विकास गेल्या ९ वर्षांत झाला आहे, असेही शिंदे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community