‘तौक्ते’नंतर आता राणेंच्या ट्विटने ‘वादळ’!

देवेंद्र फडणवीस जेव्हा वादळाची पाहणी करायला कोकणात आले, तेव्हा रत्नागिरी गेस्ट हाऊसवर उदय सामंत व त्यांचे बंधू त्यांना भेटायला तडफडत होते, असे निलेश राणे यांनी म्हटले आहे.

139

कोकणात चक्रीवादळाची चर्चा सुरू असताना आता माजी खासदार निलेश राणे यांनी केलेल्या या ट्विटमुळे राजकीय वादळ निर्माण झाले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे तौक्ते वादळामुळे कोकणाचे किती नुकसान झाले हे पाहण्यासाठी कोकण दौरा केला. त्यावेळी राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत अथक प्रयत्नाने फडणवीस यांना भेटले, फडणवीस यांची इच्छा नसतानांही ते भेटले, असे ते ट्विट होते. यामुळे सध्या कोकणात राजकीय वादळ उठले आहे. त्यावर एरव्ही मोजके बोलणाऱ्या उदय सामंत यांना मात्र या ट्विटवर मौन सोडावे लागले.

काय म्हटले निलेश राणेंनी? 

देवेंद्र फडणवीसजी जेव्हा वादळाची पाहणी करायला कोकणात आले, रत्नागिरी गेस्ट हाऊसवर उदय सामंत व त्यांचे बंधू त्यांना भेटायला तडफडत होते. दोघेही कसे तरी साहेबांच्या रूमपर्यंत पोहचले व देवेंद्रजींची इच्छा नसतानाही त्यांना भेटले. प्रसारमाध्यमं काय भलतच दाखवत आहेत, कृपया दुरुस्ती करावी. या ट्विटमुळे उदय सामंत यांना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना अशा कोणत्या महत्वाच्या विषयावर चर्चा करायची होती, अशा कोणत्या मोठ्या समस्येमध्ये मंत्री सामंत फसले आहेत, ज्यासाठी त्यांना मुख्यमंत्री सोडून विरोधी पक्षनेत्यांची भेट घ्यावीशी वाटली, यावर आता राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जाऊ लागले.

(हेही वाचा : गिरीश कुबेरांच्या पुस्तकात संभाजी महाराजांचा अपमान! खासदार संभाजी राजेंनी केली कारवाईची मागणी)

‘उद्योग’ सांभाळून घेण्यासाठी घेतली भेट!

यावर माध्यमांशी बोलताना निलेश राणे यांनी, उदय सामंत आणि त्यांचे बंधू यांचे सुरु असलेले धंदे आणि त्यावर आलेल्या अडचणी याबाबत उदय सामंत यांना देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलायचे होते, त्यासाठी त्यांचा खटाटोप सुरु होता. आम्हाला संभाळून घ्या, अशी विनंती सामंत यांनी फडणवीसांना केली, असेही निलेश राणे म्हणाले.

काय म्हणाले उदय सामंत? 

आपण स्वस्त: सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच्या दौऱ्यावर होतो. त्यावेळी देवेंद्र फडणवीसही तिथे आले. महाराष्ट्राच्या राजकारणाची एक संस्कृती आहे. त्यामुळे मी त्यांचे स्वागत केले. निलेश राणे हे खोटे बोलत असून हा निव्वळ बालिशपणा आहे. मला जर गुप्त बैठक करायची असती तर मी रत्नागिरीच्या मतदारसंघात का करेल? असे करायचे असते तर मी नागपूर, दिल्लीला जाऊन भेटलो असतो. माझ्यावर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा पूर्ण विश्वास आहे, असे मंत्री सामंत म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.