…तर यापुढे कोरोनाची ‘महाराष्ट्र सरकार व्हायरस’ ओळख! मनसेचा टोला

राज्य सरकारने येत्या २-३ दिवसांत गणेशोत्सवासाठी कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला आहे.

64

दहीहंडी उत्सवाच्या आधीपासूनच राज्य सरकारने राज्यात कोरोना वाढत आहे, असे सांगून दहीहंडी आणि नंतर येणाऱ्या गणेशोत्सवावर निर्बंध लावण्याविषयी चर्चा सुरु केली होती. त्याला भाजपा आणि मनसे यांनी विरोध सुरु केला. सोमवारी, ६ सप्टेंबर रोजी राज्य सरकारने येत्या २-३ दिवसांत गणेशोत्सवासाठी कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला आहे. यावर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राज्य सरकारवर ट्विटरद्वारे जोरदार हल्ला केला आहे.

काय म्हटले संदीप देशपांडे?

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करत राज्य सरकारवर सडकून टिका केली, ‘महाराष्ट्रात कोरोनाचे एव्हढं स्तोम माजवल जातंय की यापुढे कोरोना हा चायनीज व्हायरस ऐवजी महाराष्ट्र सरकार व्हायरस म्हणून जगात ओळखला जाईल. सरकारने कोरोना संबंधी सर्व डेटा जनतेबरोबर पारदर्शकपणे शेअर केला पाहिजे’, असे म्हटले आहे.

मनसेची ‘ही’ आहे मागणी!

राज्य सरकारने श्रावण महिन्याच्या सुरुवातीपासूनच राज्यात कोरोना वाढत असल्याचे सांगण्यास सुरु केले. दहीहंडी आणि गणेशोत्सव यांच्यावर निर्बंध लावण्याच्या सूचना करणे सुरु केले. तेव्हापासून भाजपा आणि मनसे यांनी विरोध सुरु केला. हा सरकारचा बनाव आहे, असा आरोप करत हे निर्बंध केवळ हिंदूंच्याच सणांवरच का आणली जातात, असे आरोप भाजपा आणि मनसे यांनी केला. तसेच मनसेने निर्बंध झुगारून दहीहंडी साजरी केली. आता गणेशोत्सवाच्या तोंडावर राज्य सरकारने गणेशोत्सवातही निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता मनसे पुन्हा एकदा आक्रमक होणार असल्याचे दिसत आहे. राज्य सरकारने कोरोनासंबंधी सर्व डेटा जनतेसमोर पारदर्शकपणे सादर करावा, अशी मागणी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे.

(हेही वाचा : चिपळूण तालुक्यात पुन्हा मुसळधार पाऊस! दापोलीही पाण्याखाली!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.