BDD चाळीतील निवृत्त पोलिसांना 50 लाखांऐवजी 25 लाखात मिळणार घर

76

मुंबईतील बीडीडी चाळीत राहणाऱ्या निवृत्त पोलिसांच्या कायम स्वरूपी घराबाबत गृहनिर्माण मंत्री, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मोठी घोषणा केली आहे. मुंबईतील बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पात असणाऱ्या पोलिसांच्या घरांच्या किमतीवरून विरोध झाल्यानंतर अखेर ठाकरे सरकारने मोठा ऐतिहासिक निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. या निर्णयानुसार, बीडीडी चाळीतील निवृत्त पोलिसांना 50 लाखांऐवजी 25 लाखात घर मिळणार आहे.

BDD चाळीबाबत आव्हाडांचं ट्वीट

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत माहिती दिली असून आव्हाड यांनी ट्वीट करत म्हटले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या सल्ल्यानुसार बीबीडी चाळीतील निवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांना कायम स्वरूपी नावावर करून देण्यात आले आहे. त्यामुळे आता ती घरं 50 लाखांऐवजी 25 लाख रुपयात देण्यात येणार आहे. आता घर रिकामी करा आणि प्रकल्प पुढे जाऊद्यात, असे आवाहन देखील जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.

(हेही वाचा – ‘मविआ’ सरकारची आणखी एक खेळी, ‘शिंदे गटा’तील मंत्र्यांच्या खात्यांचं फेरवाटप)

गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबईतील बीडीडी चाळींच्या नामकरणाबाबत शासन निर्णय जारी करण्यात आला होता. त्यानुसार, वरळीतील बीडीडी चाळ बाळासाहेब ठाकरे नगर, नायगावची बीडीडी चाळ शरद पवार नगर तर ना.म.जोशी बीडीडी चाळ आता राजीव गांधी नगर या नावाने ओळखली जाणार आहे. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या नामकरणाची घोषणा केली होती. त्यानंतर अखेर या नामकरणासंबंधीत शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.