नूपुर शर्मांच्या विरोधात राज्यात हजारोंच्या संख्येने मुस्लिम रस्त्यावर

118
एका बाजूला राज्यसभेसाठी मतदान सुरु असताना दुसरीकडे महाराष्ट्रात सोलापूर आणि औरंगाबाद येथे हजारोंच्या संख्येने मुस्लिम समाज रस्त्यावर उतरण्याची तयारी करत होता. शुक्रवारी, १० जून रोजी संध्याकाळचे नमाज पठन केल्यावर हजारोंच्या संख्येने मुस्लिम समाज महाराष्ट्रात रस्त्यावर उतरला होता. त्यामुळे काही काळ याठिकाणी वातावरण तणावग्रस्त बनले होते.

एमआयएमने काढला मोर्चा 

विशेष म्हणजे हा मोर्चा एमआयएमच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला होता. सोलापूर आणि औरंगाबाद येथे मोर्चा काढला होता. या मोर्च्यात अनेक मुस्लिम संघटना एकत्र झाल्या होत्या. यावेळी ५०० जण जमतील असे पोलिसांना सांगण्यात आले होते, प्रत्यक्षात मात्र ५ ते ६ हजारांचा जमाव जमला होता. त्यामुळे वातावरण तणावग्रस्त बनले होते. भाजपच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मा यांनी केलेल्या कथित वक्तव्याच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला होता. विशेष म्हणजे कालपर्यंत महाविकास आघाडी राज्यसभेच्या निवडणुकीत एमआयएमने पाठिंबा द्यावा, अशी विनंती एमआयएमकडे करत होती, अखेरीस एमआयएमने एका बाजूला महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर केला आणि दुसऱ्या बाजूला सोलापूर आणि औरंगाबाद येथे हजारोंच्या संख्येने मुस्लिमांनी निदर्शने केली, हा योगायोग आहे का, अशी चर्चा सुरु झाली आहे. यावेळी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील मोर्चाच्या ठिकाणी आले आणि त्यांनी आंदोलकांना शांत केले. मात्र नुपूर शर्मा यांची केवळ पक्षातून हकालपट्टी करणे ही कारवाई योग्य नाही, त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली.
मोर्च्यात दंगलखोर सहभागी झालेले 
या आंदोलनात दंगलखोर, नशेबाज तरुण सहभागी झाले होते, त्यांची ओळख त्वरित पटवून देण्यात यावी आणि त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी दिली. औरंगाबादमधील वातावरण आम्ही कदापि बिघडू देणार नाही, असेही जलील म्हणाले.

दिल्लीसह उत्तर प्रदेशातही हिंसक निदर्शने

दिल्लीतील जामा मशिदी बाहेरच्या निदर्शनानंतर उत्तर प्रदेशातील सहारनपूर, मुरादाबाद आणि प्रयागराजच्या रस्त्यावर शेकडो मुस्लिमांनी मोर्चा काढत दुकाने बंद करण्यास लावले आहे. तर प्रयागराजमधील एका भागात आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केल्याचीही माहिती मिळत आहे. मागील काही तासांपासून येथील परिस्थिती अस्थिर आहे. प्रेषित मोहम्मद यांचा अवमान केल्याप्रकरणी गेल्या आठवड्यात उत्तर प्रदेशातील कानपूर येथे दंगल उसळली होती. यामध्ये जवळपास ४० लोक जखमी झाले होते.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.