ठाकरे सरकार ओबीसी आरक्षणाचे मारेकरी! माधव भंडारींचा घणाघात

105

ओबीसी आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. न्यायालयात गेलेल्या प्रत्येक प्रकरणात नाचक्की होऊनही ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा काढण्याकरिता चालढकल करणाऱ्या ठाकरे सरकारचा हेतू आता स्पष्ट झाला आहे. ओबीसींना राजकीय आरक्षण देण्याची सरकारमधील तीनही पक्षांची इच्छाशक्तीच नसल्याने या प्रकरणात न्यायालयाची चपराक खाल्ल्यानंतरही पुन्हा कोलांटउड्या मारत जबाबदारी ढकलण्याचे खेळ सरकारने सुरू केले आहेत, असा आरोप भाजपाच्या माधव भंडारी यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. ओबीसींच्या आरक्षणाची पुनर्स्थापना करण्याकरिता इंम्पेरिकल डेटा तयार करणे हाच एकमेव उपाय असतानाही त्याकरिता चालढकल करून आरक्षण कायमचे गोठविण्याचा ठाकरे सरकारचा कट आहे, असेही ते म्हणाले.

जनतेची दिशाभूल केली

न्यायालयाच्या आदेशावर कार्यवाही करण्यात ठाकरे सरकारने तब्बल १५ महिने चालढकल केली आणि आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांच्या पलीकडे जात असल्याचे सांगून ते पुनर्स्थापित करण्याचे मार्ग स्वतःच बंद केले, अशी माहिती भंडारी यांनी दिली. त्यानंतर इम्पिरिकल डेटा तयार करण्याबाबत न्यायालयाने सरकारला दुसरी चपराक दिली. इम्पिरिकल डेटा लवकरात लवकर तयार करणे हाच आरक्षण स्थापित करण्याचा मार्ग आहे, याकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधामंडळात आणि मुख्यमंत्र्यांसमवेत झालेल्या बैठकीतही लक्ष वेधले. राज्य सरकारने संसाधने पुरविल्यास कमीत कमी कालावधीत असा डाटा तयार करता येईल, अशी ग्वाही मागासवर्ग आयोगाने दिल्यानंतरही आयोगाच्या मागण्या दुर्लक्षित करून राज्याचे मंत्रीच आरक्षणासाठी मोर्चे, आंदोलने करून जनतेची दिशाभूल करत होते, असा आरोपही भंडारी यांनी केला आहे. केंद्र सरकारकडे वारंवार बोटे दाखवून अपयश लपविण्याच्या पळपुट्या वृत्तीची इथेही राज्य सरकारने पुनरावृत्ती केली, केंद्र सरकार इम्पिरिकल डेटा देत नसल्याचा कांगावा सुरू केला. आता सर्वोच्च न्यायालयानेच राज्य सरकारचे कान उपटले असल्याने इम्पिरिकल डेटा तयार करणे ही राज्य सरकारचीच जबाबदारी असल्याचे स्पष्ट झाले असून त्यानंतरही राज्य सरकार पळपुटेपणा करत असल्याने, आता आरक्षणासाठी रस्त्यावर उतरून जाब विचारण्याची वेळ आली आहे, असा इशाराही भंडारी यांनी या पत्रकार परिषदेत दिला.

( हेही वाचा : हुररर्र….राज्यात 7 वर्षांनी बैलगाडा शर्यतीचा धुरळा उडणार! )

सरकारने चालढकल केली

आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे व सत्तेतील घटक पक्षांतील समन्वयाच्या अभावामुळे मराठा आरक्षणापाठोपाठ ओबीसी आरक्षणाचा मुद्दाही पुन्हा एकदा बासनात बांधण्याचे काम ठाकरे सरकारने करून दाखविले आहे. मात्र, आरक्षणाचे मारेकरी ठरवण्याचे पाप करणाऱ्या सरकारला प्रायश्चित्त दिल्याखेरीज भाजप स्वस्थ बसणार नाही, असे ते म्हणाले. केवळ अध्यादेश काढणे पुरेसे नाही, त्यासाठी ठोस पुरावे व आकडेवारी द्यावीच लागेल हे माहीत असूनही सरकारने चालढकल केल्याने न्यायालयात महाराष्ट्राची नाचक्की झाली आहे. आता तरी ठाकरे सरकारने स्वतःची लाज वाचविण्यासाठी केंद्राच्या नावाने बोटे मोडत बुद्धिभेद करण्याऐवजी ओबीसी आरक्षणाकरिता आवश्यक असलेली कार्यवाही तातडीने सुरू करावी, अशी मागणीही माधव भंडारी यांनी केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.