पत्र पाठवण्याआधी मुख्यमंत्र्यांनी प्रकरण समजून घ्यावे! फडणवीसांचा खोचक सल्ला

राज्यपालांनी लिहिलेल्या पत्रावर मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया देणारे पत्र लिहिणे हे इतिहासात पहिल्यांदाच घडत आहे.

88

राज्यातील महिलांवरील वाढत्या अत्याचारांमुळे राज्यात महिला सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे यावर तोडगा काढण्यासाठी राज्यपालांनी सरकारला केलेली सूचना मान्य न करता, हा राष्ट्रीय विषय असून यासाठी संसदीय अधिवेशनाची मागणी करावी, असे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना लिहिले. यावरुन राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. अशाप्रकारची पत्र पाठवताना मुख्यमंत्र्यांनी प्रकरणाची खातरजमा केली पाहिजे, असा खोचक सल्ला त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे.

मुख्यमंत्री कार्यालयाची अपरिपक्वता

मुख्यमंत्री कार्यालयातील सल्लागार आणि काही अधिकारी हे अतिशय अपरिक्व असल्याने अशाप्रकारचे पत्र मुख्यमंत्र्यानी पाठवले असावे. त्यामुळे अशाप्रकारे पत्र पाठवताना त्या पत्राची नीट खातरजमा केली पाहिजे, असा सल्ला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला आहे. तसेच हा सल्ला त्यांना ऐकायचा नसेल तर तो त्यांनी ऐकू नये, असेही फडणवीस म्हणाले.

(हेही वाचाः राज्यपालांची राज्याकडे मागणी, मुख्यमंत्र्यांनी चक्क ‘ती’ फेटाळली!)

इतिहासात पहिल्यांदाच घडत आहे

मुळातंच कुठल्याही पक्षाचे शिष्टमंडळ जेव्हा राज्यपालांना भेटते, तेव्हा त्यांनी केलेल्या मागण्यांबाबत राज्यपालांकडून सरकारला पत्र दिले जाते आणि त्यावर योग्य ती कारवाई करण्यास सांगितले जाते. आताही राज्य सरकारला दिलेल्या पत्रात राज्यपालांनी शक्ती कायदा लवकरात लवकर होण्यासाठी दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली आहे. हा कुठलाही आदेश नसून ती मागणी आहे. सरकार कोणाचंही असो आणि राज्यपाल कोणीही असो, याच पद्धतीने पत्र पाठवण्यात येते, हे गेल्या 25 वर्षांपासून मी पाहत आलो आहे. मात्र राज्यपालांनी लिहिलेल्या पत्रावर मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया देणारे पत्र लिहिणे हे इतिहासात पहिल्यांदाच घडत असल्याची टीका फडणवीस यांनी केली आहे.

राजकीय रंग देणे अयोग्य

सात दिवस संशोधन करुन आणि वेगवेगळ्या राज्यांत महिलांवर होणा-या अत्याचारांचे आकडे घेऊन राज्यपालांना पत्र पाठवण्यापेक्षा जर पोलिसांना कडक कारवाई करण्याचे आदेश दिले असते आणि शक्ती कायद्यावर लवकरात लवकर निर्णय घेण्याचा विचार झाला असता, तर ते अधिक संवेदनशील होते. परंतु अशाप्रकारे या गोष्टीला राजकीय रंग देणे अयोग्य असल्याची टीकाही देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर केली आहे.

(हेही वाचाः ठाकरे सरकार हे ‘माफियांचे’ सरकार… सोमय्यांचा आरोप)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.