परमबीर सिंग यांच्याकडून अक्षम्य चूक! – अनिल देशमुख 

अंबानी प्रकरण असो कि मनसुख हिरेन यांचे मृत्यू प्रकरण असो, या दोन्ही प्रकरणांच्या तपासात हलगर्जीपणा आढळून आला, त्यामुळे परमबीर सिंग यांना पदावरून हटवण्यात आले, असे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले.  

99

अंबानी प्रकरणात मुंबई पोलीस आयुक्त पदावरून उचलबांगडी करण्यात आलेले परमबीर सिंग यांनी अक्षम्य चूक केल्याचे या प्रकरणात तपास करणाऱ्या दहशतवादी विरोधी पथकाच्या लक्षात आले, त्यामुळे त्यांना पदावरून हटवण्यात आले, असे राज्याचे गृहमंत्री यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना सांगितले.

तपासात हलगर्जीपणा केला!

रिलायन्स ग्रुपचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानासमोर सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या गाडीचे प्रकरण असो कि मनसुख हिरेन यांचा मृत्यू प्रकरण असो, या दोन्ही प्रकरणाच्या तपासात हलगर्जीपणा आढळून आला, त्यामुळे सिंग यांच्यावर कारवाई झाली, असेही गृहमंत्री देशमुख म्हणाले. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी विचारविनिमय करूनच हा निर्णय घेण्यात आला, असेही गृहमंत्री देशमुख म्हणाले.

एटीएस आणि एनआयएवर विश्वास!

सध्या या प्रकरणाचा तपास वेगळ्या यंत्रणा करत आहेत. जेव्हा सिंग यांच्या नियंत्रणाखाली हा तपास होत होता, तेंव्हा त्यांचाच सहकारी जो या प्रकरणाचा तपास करत होता ते सचिन वाझे यांनी मोठ्या चुका केल्या, त्याला जबाबदार धरून सिंग यांना पदावर हटवण्यात आले. या प्रकरणात काही अधिकारी अडकले आहेत. त्यांची चौकशी सुरु आहे. अंटालिया समोर कशा प्रकारे स्फोटकांनी भरलेले वाहन ठेवण्यात आले, याचा माग एनआयए शोधून काढत आहे. एटीएस आणि एनआयए या दोन्ही यंत्रणा व्यावसायिकदृष्ट्या स्वतंत्र आहेत, त्या त्यांच्याप्रकारे दोषींना शोधून काढतील, असा विश्वास देशमुख यांनी व्यक्त केला.

(हेही वाचा : नाना देणार का ऊर्जामंत्र्यांना ‘शॉक’?)

पुन्हा आपल्यावर अन्याय झाला! – संजय पांडे यांची तक्रार 

अंबानी प्रकरणात बुधवारी, १७ मार्च रोजी पोलीस दलात फेरबदल करण्यात आले. त्यावर राज्य सुरक्षा महामंडळाचे प्रमुख संजय पांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पात्र लिहून नाराजी व्यक्त केली. नेहमी आपल्यावर अन्याय झाल्याची भावना व्यक्त या पत्रात केली आहे. आपली क्षमता असूनही दरवेळी आपल्याला साईडलाईन करण्यात आले. कुवत असतानाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालकपद आपल्याला मिळाले नाही. आतादेखील पोलीस महासंचालकपद किंवा मुंबई पोलीस आयुक्तपद रिक्त झाले असतानाही संधी देण्यात आली नाही. याउलट माझ्या कनिष्ठ अधिकाऱ्याला ते पद देण्यात आले, अशी खंत संजय पांडे यांनी व्यक्त केली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.