केंद्राच्या पत्रानंतर पंजाब सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; पंतप्रधानांच्या सुरक्षेत कुचराई प्रकरणी ९ अधिकारी दोषी

143

पंतप्रधान नरेंद्र मोदी ५ जानेवारी २०२२ रोजी पंजाबच्या फिरोजपूर जिल्ह्यातील हुसैनीवाला येथे रस्ता मार्गाने जात असताना आंदोलकांनी ३० किलोमीटरचा रस्ता अडवून धरला होता. त्यामुळे पंतप्रधानांचा ताफा ३० मिनिटे उड्डाणपुलावर अडकून पडला होता. याप्रकरणी सुरक्षेत कुचराई करणाऱ्या ९ दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेतील त्रुटी प्रकरणी पंजाब सरकार अ‍ॅक्शनमध्ये आले आहे. मुख्य सचिव व्ही. के. जंजुआ यांनी मुख्यमंत्री भगवंत मान यांना ९ अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी फाइल पाठवली आहे. पंतप्रधान मोदी ५ जानेवारी २०२२ रोजी पंजाबच्या दौऱ्यावर गेले होते, तेव्हा भटिंडा विमानतळावरुन हुसैनीवालाला जात असताना त्यांचा ताफा अर्धा तास उड्डाणपुलावर अडकून पडला होता. पंतप्रधानांच्या सुरक्षेतील त्रुटी प्रकरणी पंजाब सरकार एका आयएएस आणि ८ आयपीएस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याच्या तयारीत आहे. यामध्ये तत्कालीन मुख्य सचिव अनिरुद्ध तिवारी यांच्याशिवाय डीआयजी सिद्धार्थ चटोपाध्याय, एसएसपी हरमनदीप सिंह हंस, एसएसपी चरणजीत सिंह, एडीजीपी नागेश्वर राव, एडीजी नरेश अरोरा, आयजी राकेश अग्रवाल, आयजी इंदरवीर सिंग आणि डीआयजी सुरजित सिंग यांच्या नावांचा समावेश आहे.

नुकतेच केंद्र सरकारने पंजाब सरकारला पत्र लिहून पीएम मोदी सुरक्षा उल्लंघन प्रकरणी कारवाईचा अहवाल मागवला होता. केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी पंजाबचे मुख्य सचिव विजय कुमार जंजुआ यांना पत्र लिहून दोषी अधिकाऱ्यांवर आतापर्यंत केलेल्या कारवाईचा तपशीलवार अहवाल मागवला होता. पत्रात कारवाईला झालेल्या दिरंगाईचा संदर्भ देत, कारवाईचा अहवाल सादर करण्यास सांगितले होते, त्यानंतर आता पंजाब सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहे.

(हेही वाचा – राष्ट्रवादीच्या रामराजे निंबाळकरांची गुगली; गडकरी, राणेंचे कौतुक करीत दिले वेगळेच संकेत)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.