मुख्यमंत्र्यांचे राजकारण बालीश! ‘या’ भाजप नेत्याची टीका!

गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी अन्न व औषध प्रशासन मंत्री शिंगणे किंवा थेट फडणवीस यांच्याकडून कोणतीही माहिती न घेता, विषय जाणून न घेता थेट गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली आहे. गृहमंत्र्यांचे हे वर्तन पूर्णत: अनपेक्षित होते, असे भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड म्हणाले.

80

राज्यातील जनतेसाठी 50 हजार रेमडिसीवर औषधांचा पुरवठा करण्याचे श्रेय भारतीय जनता पार्टीला मिळू नये यासाठी आघाडी सरकारच्या काही मंत्र्यांनी गलिच्छ राजकारण केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे बालीश राजकारण आता थांबवावे, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी सोमवारी केले. मुख्यमंत्र्यांच्या या श्रेयवादाच्या खेळामुळे निरपराध जनतेचा जीव जात आहे, याची जाणीव सरकारने ठेवावी, असेही आमदार लाड यांनी सांगितले. मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

दमणला जाऊन ब्रुक फार्माच्या कंपनीशी बोलणी केली!

राज्यातील कोरोना संदर्भातील सोयी सुविधांची बिकट परिस्थिती पाहता ‘भाजपा’ ने सामाजिक बांधिलकीचे कर्तव्य म्हणून राज्य सरकारला 50 हजार रेमडिसिवरऔषधांचा पुरवठा देण्यासाठी प्रयत्न सुरू केले. भाजपाकडून रेमडिसिवरचा हा साठा राज्य सरकारकडे दिला जाणार असल्याचे आधीच स्पष्ट केले होते. यासाठी विधान परिषदचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर व मी दमणला जाऊन ब्रुक फार्माच्या कंपनीला भेट देऊन त्यांच्यापुढे प्रस्ताव ठेवला. त्यासाठी आवश्यक ती परवानगी मिळवण्यासाठी अन्न व औषध प्रशासन खात्याचे मंत्री शिंगणे यांच्याशीही संपर्क साधून त्यांना माहिती दिली. अन्न व औषध प्रशासनाने तशी परवनागीही दिली. दमणच्या औषध प्रशासनाकडूनही परवनागी मिळाली होती. मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनाही याची माहिती दिली होती. मात्र या उपक्रमाचे श्रेय भाजपाला मिळू नये या संकुचित वृत्तीमुळे महाविकास सरकारकडून शेवटच्या क्षणी संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्याला धमकी देऊन चौकशीसाठी बोलवले गेले. देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र भाजपकडून रेमडीसीवीर उपलब्ध होत आहे, या आकसापोटी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर लहान मुलासारखा कट्टी बट्टीचा डाव खेळत आहेत. यामुळे महाराष्ट्रात ज्या निष्पाप रुग्णांचे बळी गेलेत त्याला कारणीभूत हे ठाकरे सरकार आहे, अशी टीका प्रसाद लाड यांनी केली.

(हेही वाचा : कोरोनाकाळात देवस्थानांची होतेय ‘कृपा’! )

आणखी काय म्हणालेत प्रसाद लाड?

अलीकडेच राज्य सरकारकडून 11 कंपन्यांना विक्री करण्याची परवानगी दिली गेली. यामध्ये ब्रुक फार्मा या कंपनीचेसुद्धा नाव आहे. या कंपनीकडे 60 हजार औषधांच्या कुप्यांचा साठा असल्याचा आरोप पोलिसांकडून केला गेला होता. मात्र 48 तास उलटले, हा साठा कुठे आहे, या प्रश्नावर मात्र हे सरकार निरूत्तर झाले आहे. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी अन्न व औषध प्रशासन मंत्री शिंगणे किंवा थेट फडणवीस यांच्याकडून कोणतीही माहिती न घेता, विषय जाणून न घेता थेट गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली आहे. गृहमंत्र्यांचे हे वर्तन पूर्णत: अनपेक्षित होते. सत्ताधाऱ्यांच्या कोणत्याही धमकीला आम्ही घाबरत नाही. जनतेच्या कल्याणासाठी आमच्यावर कितीही गुन्हे दाखल केले तरी चालतील, असे ते म्हणाले. राज्यात रेमडिसीवर औषधांसाठी रूग्णांची फरफट होत आहे. सरकारने सद्यस्थितीचे भान राखावे, राजकारण बाजुला ठेवावे व जनतेच्या हितासाठी जे योग्य आहे त्यासाठी विरोधकांकडे जर चांगल्या योजना असतील, तर त्याची माहिती घेऊन एकत्रितरीत्या काम करावे आणि राज्याला या संकटाला बाहेर काढावे, असेही ते म्हणाले.

नवाब मलिक यांच्यावर टीका!

नवाब मलिक यांचे डोके बिथरले आहे. त्यांना फक्त एकच काम येते ते म्हणजे इकडे बसून केंद्र सरकारवर टीका करून लोकांची दिशाभूल करत राहणे, अशी टीका प्रसाद लाड यांनी केली. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज केंद्र सरकारकडे कोरोनावर नियंत्रण कसे मिळवता येईल यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन घेण्याची मागणी केली. त्यावर उत्तर देताना प्रसाद लाड म्हणाले की, संजय राऊत हे महाविकास आघाडीचे सल्लागार आहेत त्यांनी हाच सल्ला महाविकास आघाडी सरकारला द्यावा, असे प्रसाद लाड म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.