राष्ट्रपतींच्या हस्ते राजभवनातील नवीन दरबार हाॅलचे उद्घाटन

118

राष्ट्रपती राम नाथ कोविन्द यांच्या हस्ते  राजभवनातील नवीन दरबार हॉलचे उदघाटन करण्यात आले. यावेळी राष्ट्रपतींच्या पत्नी सविता कोविन्द, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,  उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्यासह इतर मान्यवर तसेच, वरिष्ठ शासकीय अधिकारी उपस्थित होते.

ही वास्तू 100 वर्षांच्या घटनांची साक्षी 

यावेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की,  मला आज या नुतनीकरण केलेल्या, ऐतिहासिक- वैभवशाली परंपरा लाभलेल्या दरबार हॉलच्या उदघाटन कार्यक्रमाला उपस्थित राहाता आले, याचा आनंद व्यक्त केला.         मुख्यमंत्री म्हणून व्यक्तीश:  आनंद होत आहे. दरबार हॉल ,राजभवन आमच्यासाठी नवं नाही. विरोधी पक्षात होतो तेव्हा वर्षभरातून एखाद दुसऱ्यावेळी शिष्टमंडळ घेऊन येत होतो. आमच्या व्यथा मांडत होतो. आजही आमचा संवाद सुरु आहे.
या वास्तुने १०० वर्षाहून अधिक काळात घडलेल्या घटना घडामोडी पाहिल्या.  ३० एप्रिल १९६० रोजी संयुक्त महाराष्ट्राच्या नकाशाचे अनावरण तत्कालीन पंतप्रधान पंडीत नेहरू यांनी याच वास्तूत  केले त्याचा विशेष आनंद आहे. ही नवीन रुप धारण केलेली वास्तु आहे. यात ज्यांचा हातभार लागला, त्या सर्वांचे मनापासून आभार, असं मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं.

सर्वोत्तम राजभवन

दरबार हॉलचं अप्रतिम असं सौंदर्य नव्या दमाने लोकांसमोर ठेवले. मुंबईतील राजभवन देशातील सर्वोत्तम राजभवन आहे. एका बाजूला अथांग समुद्र दुसऱ्या बाजूला सुंदर झाडं, ज्याला शहरातील जंगल असं देखील म्हणता येईल. याने हे राजभवन अधिकच सुंदर झाले आहे. राजकीय हवा कशीही असू द्या, इथली हवा थंड आहे. पावसाळ्यात थुई थुई नाचणारे मोर  आहेत.  इथून सर्पमित्राकडून विषारी सर्प पकडल्याचे फोटो आपण पाहतो..

( हेही वाचा: पुण्यात भाजपाचे शक्तीप्रदर्शन! सोमय्यांचा दणक्यात सत्कार! )

आनंददायी घटना घडाव्यात

अशी वास्तू शोधून सापडणार नाही. ब्रिटीश गव्हर्नरचे हे चौथे निवास स्थान होते. ग्यानी झैलसिंग यांनी शिवसेनाप्रमुखांना बोलावलं होतं, प्रणवदा होते त्यांनी मला भेटायला बोलावले होते. अशा अनेक आठवणी आहेत.  या संपूर्ण वास्तूचे जुनी वैशिष्ट्ये जपत आपण नवीन वास्तू उभारली आहे. जुना वारसा जपून आपण आधुनिकीकरणाकडे चाललो आहोत, हे या वास्तूचे वैशिष्ट्य आहे. ऊन, वारा, पाऊस झेलताना इमारतीवरही परिणाम होतो.  जुनी वैशिष्ट्ये कायम ठेऊन नुतनीकरण करण्याचे आवाहन पेलले. आधुनिकता अंगी बाळगताना संस्कृती जपणे, जुन्या नव्याचा समतोल साधणे गरजेचे आहे. पारतंत्र्यांच्या घटनांची आठवण जपणारी वास्तू सशक्त लोकशाहीचा वारसा पाहण्यासही सज्ज झाली आहे. या वास्तूत आनंददायी घटना घडत राहतील, अशी अपेक्षा करतो, असं मुख्यमंत्री यावेळी  म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.