भाषा, प्रांत अडथळे ठरत नाहीत हे नायडूंनी केले सिद्ध! पंतप्रधानांकडून उपराष्ट्रपतींचे कौतुक

101

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यसभेत मावळते उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष एम. व्यंकय्या नायडूंसाठी निरोपाचे भाषण दिले. वरिष्ठ सभागृहाचे पदसिद्ध अध्यक्ष असलेल्या उपराष्ट्रपतींप्रती पंतप्रधानांनी आदर व्यक्त केला. सभागृह आणि देशासाठी दिलेल्या मार्गदर्शन आणि योगदानाबद्दल पंतप्रधानांनी उपराष्ट्रपतींचे आभार मानले.

मोदींकडून उपराष्ट्रपतींवर स्तुतीसुमनं

पंतप्रधानांनी उपराष्ट्रपतींच्या बुद्धीचे आणि शब्द वापरण्याचे चातुर्य अधोरेखित केले. ते म्हणाले “तुमचा प्रत्येक शब्द ऐकला जातो, पसंत केला जातो आणि त्याचा आदर केला जातो. आणि कधीही विरोध केला जात नाही”. पंतप्रधान पुढे म्हणाले “. व्यंकय्या नायडूजी यांचे वन लाइनर्स प्रसिद्ध आहेत. ते खुमासदार असतात. भाषांवरील नेहमीच त्यांचे उत्तम प्रभुत्व हिले आहे”. पंतप्रधान म्हणाले की, सभागृहात आणि बाहेर दोन्ही ठिकाणी, उपराष्ट्रपतींच्या प्रचंड अभिव्यक्ती कौशल्याने मोठा प्रभाव पाडला आहे. “ नायडूजी जे सांगतात त्यामध्ये उत्कटता आणि महत्वपूर्ण बाबी दोन्ही असतात. ते अतुलनीय तितकेच थेट असते. तुम्ही जे बोलता त्यामध्ये बुद्धी आणि खुमासदारपणा, जवळीक असते आणि ज्ञान आणि अनुभवाने परिपूर्ण असते, असे ते म्हणाले.

(हेही वाचा – TET Scam: टीईटी परीक्षा घोटाळ्यातही ED करणार मनी लॉंड्रिंगचा तपास)

नायडू यांनी निवडलेल्या विचारसरणीला जिथे तात्काळ समर्थनाची शक्यता नव्हती त्या दक्षिण भारतातील एम. व्यंकय्या नायडू यांच्या राजकीय कारकिर्दीच्या विनयशील सुरुवातीचा संदर्भ देत, पंतप्रधान म्हणाले की, राजकीय कार्यकर्ता ते त्यांच्या पक्षाच्या अध्यक्षापर्यंतचा उपराष्ट्रपतींचा प्रवास हा त्यांची विचारधारेवरील निष्ठा आणि समर्पण भावनेच्या दुर्दम्य दृढतेचे प्रतिबिंब आहे. “आपल्याला देशाप्रती भावना असेल, आपले विचार मांडण्याची कला असेल, भाषिक विविधतेवर विश्वास असेल तर भाषा आणि प्रांत हे कधीच आपल्यासाठी अडथळे ठरत नाहीत आणि तुम्ही हे सिद्ध केले आहे,” असे पंतप्रधान म्हणाले.

मातृभाषेवरील प्रेमाचाही पंतप्रधानांकडून उल्लेख

उपराष्ट्रपतींच्या मातृभाषेवरील प्रेमाचाही पंतप्रधानांनी उल्लेख केला. वेंकैय्याजींबद्दलची एक प्रशंसनीय गोष्ट म्हणजे त्यांना असलेली भारतीय भाषांची आवड, सभागृहाचे अध्यक्षपद त्यांनी ज्याप्रकारे सांभाळले यावरून हे दिसून आले आहे. त्यांनी राज्यसभेच्या कामकाजाची उत्पादकता वाढवण्यात योगदान दिले, असे पंतप्रधान म्हणाले. उपराष्ट्रपतींनी यंत्रणा स्थापित केल्या, त्यांच्या नेतृत्वाने सभागृहाच्या कामकाजाला नवी उंची प्राप्त करून दिली, याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले. सभागृहातील उपराष्ट्रपतींच्या नेतृत्वाच्या काळात, सभागृहाच्या कामकाजात 70 टक्क्यांची वाढ झाली, सदस्यांची उपस्थिती वाढली आणि विक्रमी 177 विधेयके मंजूर झाली किंवा त्यावर चर्चा झाली. “तुम्ही असे अनेक निर्णय घेतले आहेत जे वरिष्ठ सभागृहाच्या आगामी वाटचालीत स्मरणात राहतील”, असे पंतप्रधान म्हणाले.

विविध पदे भूषविलेल्या व्यंकय्या नायडूंशी असलेले निकटचे संबंध पंतप्रधानांनी अधोरेखित केले. पक्षाचा कार्यकर्ता म्हणून उपराष्ट्रपतींची वैचारिक बांधिलकी, आमदार म्हणून काम, खासदार म्हणून दिलेले योगदान , भाजपचे अध्यक्ष म्हणून संघटन कौशल्य, मंत्री पद भूषवताना केलेली मेहनत आणि मुत्सद्दीपणा आणि उपराष्ट्रपती आणि सभापती म्हणून त्यांचे समर्पण आणि सन्मान यांचे त्यांनी कौतुक केले. “मी एम. व्यंकय्या नायडूजींसोबत गेल्या अनेक वर्षांपासून काम केले आहे. मी त्यांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या स्वीकारतानाही पाहिले आहे आणि त्यांनी ती प्रत्येक जबाबदारी समर्पित वृत्तीने पार पाडली आहे,” असे पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधान म्हणाले की सार्वजनिक जीवनातील लोकांना उपराष्ट्रपती नायडू यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.