गड-दुर्गांच्या रक्षणासाठी शिवरायांचे मावळे पुन्हा आझाद मैदानात एकवटले

110

स्वराज्याचे रक्षण आणि स्वधर्म वाचवण्यासाठी पाच मोगली पातशाह्यांशी प्राण पणाला लावून छत्रपती शिवाजी महाराजांनी मिळवलेले शेकडो गड दुर्गं आज अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहेत. पडझड, अस्वच्छतेमुळे गड-दुर्गांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. हे रोखण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व गड-दुर्गांचे जतन, संवर्धन, रक्षण आणि त्यावरील अतिक्रमणे दूर करण्यासाठी स्वतंत्र ‘महाराष्ट्र गड-दुर्ग महामंडळा’ची राज्य सरकारने स्थापना करावी, या मागण्यांसाठी ‘महाराष्ट्र गड दुर्ग रक्षण समिती’च्या वतीने मुंबईत ३ मार्चला काढण्यात आलेल्या ‘गड-दुर्ग रक्षण महामोर्चात छत्रपती शिवाजी महाराजांचे हजारो मावळे महाराष्ट्रभरातून एकवटले.

( हेही वाचा : पहाटेच्या शपथविधीवर मुख्यमंत्री असे काय बोलले की फडणवीस, अजित पवारही गोंधळलेले )

शुक्रवारी दुपारी १२ वाजता मेट्रो सिनेमा ते आझाद मैदान अशा काढण्यात आलेल्या या मोर्च्यामध्ये महाराष्ट्रभरातून शेकडो गड दुर्गप्रेमी संघटना, छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांचे वंशज, विविध संप्रदाय, हिंदुत्वनिष्ठ संघटना, शिवप्रेमी व धर्मप्रेमी नागरिक हजारोच्या संख्येने सहभागी झाले होते. मुखात छत्रपती शिवरायांचा जयघोष, डोक्यावर भगव्या टोप्या, हातात भगवे झेंडे, मागण्यांचे फलक, तुतारी, मावळ्यांच्या वेशात महामोर्च्यात सहभागी झालेल्या गड-दुर्गप्रेमींनी गड दुर्गाच्या रक्षणासाठी शासनाला आणि जनतेला आत साद घातली. प्रत्येकाने ‘शिवरायांचा एक मावळा’ म्हणून मोर्च्यात सहभाग घेतला.

नुकतेच प्रतापगडाच्या पायथ्याशी अफझलखानाच्या कबरीभोवती मोठ्या प्रमाणात केलेले अतिक्रमण हटविण्याची विद्यमान शिंदे फडणवीस सरकारने धाडसी कृती केली; मात्र बाजीप्रभू देशपांडे यांच्या अतुलनीय पराक्रमाची साक्ष देणाऱ्या कोल्हापूरातील विशाळगडावर १०० हून अधिक अनधिकृत आरसीसी बांधकामे झाल्याचे माहितीच्या अधिकारात उघड झाले आहे. अशाच प्रकारे रायगड, लोहगड, कुलाबा, बंदनगड, दुर्गाडी किल्ला यांसह राज्यातील महत्त्वाच्या ३५ गड-दुर्गांवर अवैधपणे घरे, कबरी, दर्गे, मशिदी आणि अन्य विविध प्रकारची अतिक्रमणे झालेली आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-दुर्गावरील ही अतिक्रमणे शिवप्रेमींच्या श्रद्धांवर आघात करणारी तर आहेत, तशीच प्रचंड चीड आणणारी आहेत. याचे गांभीर्य लक्षात घेऊन पुरातत्व विभागाच्या जे विद्यमान आणि निवृत्त अधिकायांच्या दुर्लक्षामुळे ही अतिक्रमणे झालीत त्यांच्यावर गुन्हे नोंदवून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

सरकारकडे केलेल्या मागण्या

  • अनेक गड-दुर्गाच्या ठिकाणी होणारे मद्यपान, विद्रूपीकरण, अस्वच्छता आदी अपप्रकार थांबवावेत, तसेच अनेक गड-दुर्गांची मोठ्या प्रमाणावर झालेली पडझड, ढासळलेले बुरूज, तोफांची दुरावस्था थांबविण्यासाठी पुरातत्व विभागाने लक्ष घालावे.
  • पुरातत्त्व खात्याकडे असलेले अपुरे मनुष्यबळ पहाता शासनाने पुरेसा कर्मचारीवर्ग नियुक्त करावा, तसेच गडांची नियमित स्वच्छता आणि पावित्र्यरक्षण यांसाठी शासनाने गड-दुर्ग संघटनांचे साहाय्य घ्यावे.
  • पुरातत्त्व खात्याने सर्व गड-दुर्गाची योग्य माहिती आणि कायदेशीर बाबी सांगणारे संकेतस्थळ सुरू करावे. त्यात नागरीकांना तक्रार करण्याची सोय करण्यात यावी.
  • ‘गड-दुर्गाच्या स्वतंत्र महामंडळा’त गड-दुर्ग संवर्धनासाठी कार्य करणारे प्रतिनिधी, छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांचे वंशज, गड परिसरातील दुर्गप्रेमी, शिवप्रेमी संघटना यांना सहभागी करावे आदी मागण्याही करण्यात आल्या.
  • गड-दुर्ग रक्षणासाठी छत्रपती शिवरायांच्या प्रेरणेने आरंभलेला हा लढा गड-दुर्गाचे रक्षण आणि संवर्धन होईपर्यंत पुढेही सुरूच राहील, असेही ‘महाराष्ट्र गड दुर्ग रक्षण समिती’च्या वतीने सांगण्यात आले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.