“भाजपने निवडणूक लढवू नये; ऋतुजा लटके आमदार होतील हे पहावं”; राज ठाकरेंचे फडणवीसांना पत्र

139

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी अंधेरी पोटनिवडणुकीसंदर्भात राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिले आहे. भाजपने ही निवडणूक लढवू नये अशी विनंती राज ठाकरेंनी आपल्या पत्राद्वारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे.

( हेही वाचा : 25 वर्ष मुंबईची तुंबई होतेय आम्हाला सहानुभूती कधी मिळणार? मनसेचे उद्धव ठाकरेंवर टिकास्त्र)

राज ठाकरेंचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र

आमदार कै. रमेश लटके ह्यांच्या दुर्दैवी निधनानंतर अंधेरी (पूर्व) या विधानसभेच्या जागेसाठी पोट निवडणूक जाहीर झाली आहे. तिथे त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. यासंदर्भात आता राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहित विनंती केली आहे. कै. रमेश एक चांगले कार्यकर्ते होते. अगदी शाखा प्रमुखापासून त्यांची वाटचाल सुरू झाली. त्यांच्या राजकीय प्रवासाचा मी एक साक्षीदार आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीनं आमदार होणं यामुळे कै. रमेश लटके यांच्या आत्म्यास खरोखर शांती मिळेल. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने ही निवडणूक लढवू नये आणि त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके आमदार होतील हे पहावं अशी विनंती मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी फडणवीसांना केली आहे.

हे आपल्या महाराष्ट्राच्या महान संस्कृतीशी सुसंगत

मी आमच्या पक्षातर्फे अशा परिस्थितीत जेंव्हा दिवंगत आमदाराच्या घरच्या व्यक्ती निवडणूक लढवतात तेव्हा शक्यतो निवडणूक न लढवण्याचं धोरण स्वीकारतो. तसं करण्याने आपण त्या दिवंगत लोकप्रतिनिधीला श्रध्दांजलीच अर्पण करतो अशी माझी भावना आहे. आपणही तसं करावं असं मला माझं मन सांगतं. असे करणं हे आपल्या महाराष्ट्राच्या महान संस्कृतीशी सुसंगतही आहे. मला आशा आहे आपण माझ्या विनंतीचा स्विकार कराल. असे राज ठाकरेंनी आपल्या पत्रात लिहिले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.