राज ठाकरेंचे भोंग्यांविरोधात पुन्हा रणशिंग; ‘अरेला का रे’ करा!

127

मशिदींवरील भोंगे उतरवले पाहिजे ही बाळासाहेबांची इच्छा होती, पूर्ण आपण केली. कारण भोंगे काढा, असे आपण कधी म्हटले नाही. भोंगे काढले नाही तर हनुमान चालीसा म्हणू, असे म्हटल्यावर भोंगे निघाले आहेत. पण अजूनही काही ठिकाणी चरबी उतरली नाही. जिथे जिथे असे भोंगे उतरले नसतील, तिथे तेथील पोलिसांकडे तक्रार करा, कारवाई केली नाही तर न्यायालयाचा अवमान केल्याची केस होईल. त्यानंतर मोठ्या ट्रॅकवर मोठे स्पीकर घेऊन हनुमान चालीसा लावा. जोपर्यंत आरे ला कारे होत नाही तोवर असेच होणार, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे रविवारी, २७ नोव्हेंबर रोजी मनसेच्या गटाध्यक्षांच्या मेळाव्यात बोलत होते.

मी कट्टर मराठी आणि कट्टर हिंदुत्वादी! 

रझा अकादमीने मोर्चा काढला होता, तेव्हा पत्रकार, महिला पोलीस यांचा विनयभंग केला होता, त्यांच्याविरोधात मनसेने मोर्चा काढला होता, परत मोर्चा काढण्याची त्यांची हिंमत झाली नाही, फक्त हिंदुत्व, हिंदुत्व म्हणणारे तेव्हा कुठे होते? काल-परवा मुख्यमंत्री होते ते तेव्हा त्यांना पाहिले का, तब्येतीचे कारण सांगून गप्प बसले. एकनाथ शिंदेने रात्रीच्या रात्री जी फिरवली कांडी, आता फिरतायेत सगळीकडे. स्वतःच्या स्वार्थासाठी दिसेल तो हात हातात घेऊन बागेमध्ये बसणाऱ्यांपैकी मी नाही. हिंदुत्वाच्या मुद्यावर किंवा मराठी मुद्यावर उद्धव ठाकरे यांच्यावर एक तरी केस आहे का?  कधी भूमिका घेतलीच नाही, फक्त सत्तेत बसावा!, असेही राज ठाकरे म्हणाले. पाकिस्तानाचे कलावंत धुडगूस घालणार होते, तुम्ही त्यांना हाकलून लावले, कुठे होते हिंदुत्ववादी? कट्टर मराठी आणि कट्टर हिंदुत्वादी घरात जन्म झाला आहे माझा, राज ठाकरे यांनी म्हणे हिंदुत्व स्वीकारले म्हणतायेत,  हो आधीपासूनच मी हिंदुत्ववादीच होतो, असेही राज ठाकरे म्हणाले.

(हेही वाचा राहुल गांधी गुळगुळीत मेंदुचे, सावरकरांवर बोलायची लायकी तरी आहे का? राज ठाकरेंचा घणाघात)

मनसेच्या आंदोलनाची पुस्तिका काढणार!

मनसेची स्थापन होऊन १६-१७ वर्षे झाली, त्यामध्ये ज्या भूमिका घेतल्या, आंदोलने केली, त्याचा स्ट्राईक रेट काढला तर अन्य पक्षांच्या पेक्षा आपल्या आंदोलनांना जास्त यश आले आहे. मनसैनिकांच्या मार्फत जी आंदोलने होतील ती लोकांच्या विस्मरणात कशी जातील यासाठी काही यंत्रणा काम करत होत्या. टोलचे आंदोलन राज्यभर पेटले होते. जवळपास ६५-७० टोलनाके बंद झाले. ज्या पक्षांनी टोल मुक्त करू, असे सांगितले होते, त्यांना एकही प्रश्न विचारला नाही. आता आपण एक पुस्तिका काढत आहोत, त्यात आपण कोणकोणती आंदोलने केली आणि ती कशी यशस्वी झाली याचा तपशील असेल, असे सांगत राज ठाकरे म्हणाले रेल्वेच्या परीक्षांचे आंदोलन असेल, महाराष्ट्रातील रेल्वेच्या जागांसाठी परीक्षा होत्या, त्याच्या जाहिराती उत्तर प्रदेश, बिहारमध्ये दिल्या. परीक्षेच्या वेळी मनसैनिकांनी हटकले, तर बिहारी पोरांनी आईवरून शिव्या दिल्या, याच बाजूच्या गुजरातमध्ये एका काँग्रेसचा आमदार कल्पेश ठाकूर याने तिथे उत्तर प्रदेशाच्या माणसाने बलात्कार केला, तेव्हा त्याने उत्तर भारतीयांना मारामार मारले आणि २० हजार लोकांना हाकलून लावले. त्या कल्पेश ठाकूरला  २०१९ मध्ये उमेदवारी दिली, त्यावर काही कुणी प्रश्न विचारला नाही, पण मनसैनिकांचा विषय सतत चालू ठेवला, देश तोडायचे आंदोलन नव्हते महाराष्ट्राच्या लोकांसाठी ते आंदोलन होते, असेही राज ठाकरे म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.