हे घ्या पुरावे; राहुल गांधींच्या आरोपांना रणजित सावरकरांचे सडेतोड उत्तर

101

राहुल गांधी यांनी वीर सावरकर यांच्या पत्राचा उल्लेख केला, ज्यात १९२० साली त्यांनी ब्रिटिशांना पत्र लिहिले होते, त्यामध्ये ज्यात वीर सावरकर यांनी ‘आय ह्याव द हॉनर द रिमेन सर, युवर ओबेडन्ट सर्वंट’ असे म्हटले आहे. याचा सरळ अर्थ आहे ‘मी तुमच्या सेवेस तत्पर आहे’. असे लिहिण्याची त्यावेळी ही पद्धतच होती. कारण त्याच काळात ब्रिटिश प्रशासनातील एका सेक्रेटरीने दुसऱ्या सेक्रेटरीला पत्र लिहिले होते, त्याच्या खालीही हीच वाक्यरचना होती. विशेष म्हणजे स्वतः महात्मा गांधी यांनीही ते जेव्हा बंदिवासात होते, तेव्हा ब्रिटिश सरकारकडे सुटकेसाठी याचिका केली आहे, त्याच्या खालीही गांधी यांनी देखील हीच वाक्यरचना वापरली आहे. त्या वाक्यरचनेचे मुर्ख राहुल गांधी यांनी गुगल भाषांतर करून ‘मै आपका नोकर बनना चाहता हूँ’, असे म्हटले आहे. मग राहुल गांधी यांना महात्मा गांधी यांनाही हाच न्याय लावायचा आहे का? मी असे म्हणणार नाही, कारण मी मूर्ख नाही, अशा शब्दांत स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्यवाह आणि वीर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर यांनी राहुल गांधी यांच्या आरोपावर सडेतोड शब्दांत उत्तर दिले.

वीर सावरकर यांनी भीक नाही हक्क मागितला होता 

वीर सावरकर जेव्हा अंदमानात १० वर्षे कारागृहात होते, कठोर कारावास भोगत होते. तिथे नियम होता की, सहा महिने कोणत्याही कैद्याला सेल्युलर जेलमध्ये ठेवण्यात यावे, त्यानंतर त्याला बॅरेकमधून बाहेर सोडले जायचे, पण सावरकर १९१० साली अंदमानात गेले, त्यानंतर तीन वर्षे झाले तरी त्यांना बॅरेकमध्ये सोडले नाही, म्हणून त्यांनी ब्रिटिश सरकारला पहिला अर्ज लिहिला होता. कोणतीही दयेची याचिका करतो तेव्हा कुणी भीक मागत नाही, जेव्हा कुणी कायद्याकडे जातो तेव्हा हक्क मागतो, त्यानुसार १९१३ सालची वीर सावरकर यांची जी याचिका होती, ती हक्क मागणारी होती. त्यात ते म्हणाले होते की, मला सहा महिन्यानंतर कोठडीतून बॅरेकमध्ये सोडायला पाहिजे होते, परंतु माझ्यासह माझ्या साथीदारांना इथे अडकवून ठेवले आहे’, असे वीर सावरकर म्हणाले होते. त्यावर ब्रिटिश सरकार म्हणाले होते की, तुम्ही सामान्य बंदी आहात. त्यावर वीर सावरकर यांनी ‘असे असेल तर तुम्ही सामान्य बंदीवानाच्या सुविधा द्या’, अशी मागणी केली. ज्यात त्यांना बॅरेकमध्ये सोडण्याचा नियम होता. त्यानंतर ब्रिटिश सरकार म्हणायचे, ‘तुम्ही विशेष कैदी आहात’. मग सावरकर म्हणायचे की, ‘आम्ही विशेष कैदी आहोत, तर आम्हाला राजबंदीच्या सुविधा द्या, राजबंद्यांचे काय अधिकार होते ते महात्मा गांधी जेलमध्ये आगाखान पॅलेसमध्ये जसे राहत होते, तशा जशा सुविधा मिळत होत्या, त्या त्यांना मिळायला हव्यात.’ त्याच अर्जात वीर सावरकर म्हणाले होते की, ‘जर तुम्हाला मला अंदमानात ठेवणे कठीण असेल, तर मला ब्रह्मदेश किंवा भारतातील कारागृहात पाठवा’, ही त्यांची मुख्य मागणी होती. जगात बंदीवानांना माणुसकीची वागणूक मिळते, पण ब्रिटिश राजवटीत आम्हाला अमानवीय वागणूक मिळत आहे’, असेही वीर सावरकर म्हणाले होते. जर तो दयेचा अर्ज होता, तर मग त्यात कुणी असे लिहू शकतो का?, असा थेट सवाल रणजित सावरकर विचारला.

(हेही वाचा …तेव्हा नेहरुंनी शपथ घेतली होती, मी ब्रिटिश सम्राट आणि त्याच्या वंशजांशी आजन्म निष्ठा राखीन!)

सावरकरांनी सहकाऱ्यांच्या सुटकेसाठी केलेला अर्ज 

वीर सावरकर यांनी १९१४ मध्ये दुसरा अर्ज केला होता. त्यात त्यांनी म्हटले की, देशावर सध्या महायुद्धाचे संकट आहे, त्यामुळे तुम्ही सगळ्या राजकीय कैद्यांना सोडा, जर माझ्या मुक्ततेवर तुम्हाला आक्षेप असेल, तर मला न सोडता अन्य बंदीवानांना सोडा. त्यानंतर १९१७च्या अर्जात वीर सावरकर लिहितात की, जर सर्वांच्या सुटकेत माझे नावे आहे ही तुम्हाला जर अडचण वाटत असेल, तर माझे नाव काढावे, मला माझ्या सुटकेचे जेवढे समाधान असेल तितकेच समाधान मला इतरांच्या सुटकेने मिळेल’, असे वीर सावरकर म्हणाले. या राजबंद्यांबरोबरच जे भारताचे क्रांतिकारक देशाच्या बाहेर फिरत होते त्यांनाही मातृभूमीत परत येण्याची परवानगी मिळावी, असेही वीर सावरकर यांनी त्यांच्या या अर्जात म्हटले आहे. असाच अर्ज वीर सावरकर यांनी १९१८ साली केला होता. त्यानंतर ब्रिटिशांनी या सर्व अर्जांचा उल्लेख करताना, ‘असे अर्ज करण्याची मुभा सर्व कैद्यांना आहे.’ त्यात कुठेही त्याचा ‘माफीनामा’ असा उल्लेख केला नाही. १९१८ मध्ये वीर सावरकर यांनी जी याचिका केली होती, त्यातही वीर सावरकर यांनी कुठेही खेद किंवा खंत व्यक्त केली नव्हती. त्यात वीर सावरकर म्हणतात की, त्या काळी भारतात जी परिस्थिती होती, त्यामुळे आम्हाला हातात शस्त्र हाती घ्यावे लागले होते. आता जर तुम्ही व्यवस्थेत बदल केला आहे, शांतीच्या मार्ग स्वीकारला आहे, तर मग आम्हालाही त्यात सहभागी होणे आवडेल, असेही वीर सावरकर म्हणाले.

वीर सावरकर घाबरलेले नव्हते 

ब्रिटिश गुप्तचर विभागाचा अहवाल आहे, त्यात म्हटले आहे की, १९१३ साली वीर सावरकर मॅडम कामा यांच्याशी गुप्त पत्रव्यवहार करत होते आणि ते पत्र त्या सर्वांना पाठवत होते. वीर सावरकर यांना इथे कुठलीही मोकळीक देणे शक्य नाही, त्यानंतर जर त्यांना भारतात पाठवले, तर ते तेथून पळून जातील, ते इतके महत्वाचे नेते आहेत की, युरोपातील भारतीय नेते त्यांना सोडवण्यासाठी कट रचून तो अल्पकाळात अमलात आणतील. जर त्यांना अंदमानातील सेल्युलर जेलमधून बाहेर काढले तर त्यांना त्यांचे मित्र सहजतेने एखादे जहाज जवळपास लपवून ठेवतील आणि त्यातून त्यांची सुटका करतील, असे त्यात म्हटले आहे, असेही रणजित सावरकर म्हणाले. वीर सावरकर यांच्यासोबत जे राजबंदी राहिले होते, त्यांच्यासोबत उल्हासकर दत्त यांचा उल्लेख करावा लागेल. तेव्हा त्यांना ताप आला होता, तरीही त्यांना भिंतीवर उलटे टांगून ठेवण्यात आले होते. तो ताप त्यांच्या डोक्यात गेला आणि त्यांना वेडाचे झटके येऊ लागले. त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहून ठेवले आहे की, तेव्हा एका प्रसंगात दत्त म्हणाले की, माझ्या बाजूने विनायक लढेल. विनायक सावरकर लढले आणि जिंकलेही. ही घटना १९१२ सालची आहे. जे आज सावरकर त्यावेळी घाबरले होते असे म्हणतात, तेव्हा खरे तर सावरकर घाबरलेच नव्हते’,  याला पुष्टी देणारा हा प्रसंग आहे.

(हेही वाचा एका बाईपायी नेहरुंनी देशाशी विश्वासघात केला; रणजित सावरकर यांचा गौप्यस्फोट)

तर राहुल गांधी सर्व क्रांतीकारकांना दोषी ठरवणार का? 

१९१३ मध्ये सुराज्य पत्रिकेचे पत्रकार राम शरण शर्मा यांना १० वर्षांची शिक्षा देण्यात आली होती, ते म्हणाले की, जर विनायक सावरकर ५० वर्षे शिक्षा भोगत असतील, तर मीदेखील १० वर्षे शिक्षा भोगायला तयार आहे. १९१९ साली भाई परमार म्हणतात की, त्यावेळी जेलमध्ये कुठली घटना घडली तरीही जेलर त्याला सावरकर बंधूनाच जबाबदार धरत. याचे सगळे पुरावे उपलब्ध आहेत. सावरकर यांचे मत होते की, क्रांतीकारकांनी कुठेही खितपत पडू  नये, त्यांनी स्वतःची सुटका करून घ्यावी, तुम्ही सुटका करून बाहेर जा आणि सक्रिय व्हा. सचिनराज संन्याल यांना १९१५ साली फाशीची शिक्षा सुनावण्यात आली, त्यानंतर त्यांची शिक्षा जन्मठेपेत रूपांतरित झाली, पुढे त्यांची सुटका झाली.  त्यांनी लिहून ठेवले आहे की, वीर सावरकर यांनी माझ्याप्रमाणेच ब्रिटिश सरकारकडे याचिका केल्या, त्यावेळी वीर सावरकर यांच्याप्रमाणेच माझ्या याचिकेत म्हटले होते की,  ‘माझी सुटका झाल्यावर मी कोणत्याही राजकारणात सहभाग घेणार नाही.’ त्यानंतरही माझी सुटका झाली, पण त्यांची सुटका झाली नाही. असे असेल तर राहुल गांधी सर्व क्रांतीकारकांना दोषी ठरवणार का?. असेही रणजित सावरकर म्हणाले.

(हेही वाचा गांधीही ब्रिटिशांचे नोकर होण्यास तयार होते का, फडणवीसांनी राहुल गांधींना पुराव्यानिशी विचारला प्रश्न)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.