‘छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरुन सांगतो, मी जे बोललो ते…’, वडिलांच्या प्रतिक्रियेवर संभाजी राजेंचं उत्तर

84

संभाजी राजे छत्रपती यांनी राज्यसभेच्या निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली. त्यानंतर शनिवारी पत्रकार परिषद घेत संभाजी राजे यांचे वडील शाहू छत्रपती यांनी मात्र संभाजी राजे यांचेच कान टोचले. त्यामुळे या मुद्द्याला एक वेगळेच वळण लाभले. पण आता संभाजी राजे यांनी ट्वीट करत याचा खुलासा केला आहे. मी जे बोललो ते सत्यत बोललो आहे. माझ्या वडिलांच्या बोलण्यावर मी काही बोलू इच्छित नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

छत्रपतींना स्मरुन सांगतो मी…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपला शब्द फिरवल्याचे सांगत, आपण ही राज्यसभा निवडणूक लढवत नसल्याचे संभाजी राजे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले. त्यानंतर राजकीय वर्तुळातून शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर छत्रपती घराण्याचा अपमान केल्याची टीका करण्यात आली. यावरुन ही सगळी भाजपची खेळी असल्याचे शाहू छत्रपती यांनी म्हटले. यावर आता संभाजी राजे यांनी खुलासा केला आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरून पत्रकार परिषदेत मी सत्य तेच बोललो आहे. माझ्या वडिलांचा मी आदरच करतो. ते जे बोलले त्यावर मी काही बोलू इच्छित नाही.’, असे ट्वीट करत संभाजी राजे यांनी खुलासा केला आहे.

(हेही वाचाः ‘हा शनी महाराष्ट्रातून लवकर दूर व्हावा यासाठी…’, नवनीत राणांचा ठाकरे सरकारवर निशाणा)

संजय राऊत शाहू छत्रपतींचे आशिर्वाद घेणार

संभाजी राजे छत्रपती यांचे वडील शाहू छत्रपती यांच्या विधानाचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कौतुक केले आहे. कुणीतरी संभाजी राजेंना पुढे करुन महाराष्ट्रात वेगळे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करत आहे. आजही कोल्हापूरच्या मातीत प्रामाणिकपणा जिवंत आहे. मी शाहू छत्रपतींना भेटून त्यांचे आशिर्वाद घेणार असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

(हेही वाचाः मनसैनिक पत्रकातून जनतेच्या संपर्कात, राज ठाकरेंच्या सूचना)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.