मोठी बातमी! औरंगाबाद, उस्मानाबाद, नवी मुंबई विमानतळ नामकरणाला शिंदे सरकारची स्थगिती

127

औरंगाबादचे संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशीव आणि नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव देण्याच्या महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी स्थगिती दिली. मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार होताना, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने घेतलेले निर्णय रोखण्याचे आदेश नव्या सरकारने दिले असून, मुख्यमंत्री या सर्व निर्णयांचा फेरआढावा घेणार आहेत.

एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर, ते भाजपसोबत सत्ता स्थापन करणार असल्याचे, स्पष्ट झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने अखेरच्या मंत्रिमंडळ बैठकीत अनेक लोकप्रिय निर्णय घेतले होते. या मंत्रिमंडळ बैठकीत औरंगाबाद शहराचे संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशीव असे नामकरण करतानाच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता या निर्णयांना शिंदे सरकारने स्थगिती दिली आहे.

मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्यास सांगितल्यानंतर सरकारला असे निर्णय घेता येत नाहीत. अशी भूमिका घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयांवर आक्षेप घेतला होता. त्यानुसार गुरुवारी मंत्रिमंडळ बैठकीत या सर्व निर्णयांना स्थगिती देण्यात आली आहे. तसेच, ठाकरे सरकारने घेतलेल्या सर्वच निर्णयांना स्थगिती दिली जाणार नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले होते.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.