कर्तृत्व नव्हतं म्हणून तुम्हाला सहानभुती घ्यावी लागली; संदीप देशपांडेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

80

गुढीपाडव्याच्या निमित्ताने शिवतीर्थावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय भाषण करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. त्यापूर्वी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी भाषण करून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे. तसेच आदित्य ठाकरेंवरही हल्लाबोल करत येणाऱ्या महापालिका निवडणूकीत ज्यांनी ज्यांनी आपल्याला हिणवलं आहे, त्यांना आपल्याला त्यांची लाईकी दाखवून द्यायची आहे. आगामी निवडणूकीत मनसे सत्तेत असल्याशिवाय राहणार नाही, ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे, असे संदीप देशपांडे म्हणाले.

नक्की काय म्हणाले देशपांडे?

‘मनसेला या पक्षाला १७ वर्ष झाली. या १७ वर्षात आपण काय केलं, जे इतर पक्षांनी गेल्या २५ ते ३० वर्षात केलं नाही, असं विचारलं. तर त्याचं उत्तर असेल संघर्ष. मनसेच्या सैनिकाला निवडणूक यश येवो किंवा निवडणूकीत अपयश येवो, हा संघर्षाला घाबरला नाही, आणि संघर्ष करण्यासाठी रस्त्यावर उतरायला कचरला नाही. ही शिकवण आम्हाला राज ठाकरेंनी दिला. अपयशाला घाबरू नका आणि यशाने माजू नका, ही शिकवण राज ठाकरेंनी दिली. राज ठाकरेंचे कट्टर सैनिक असल्याचा आम्हाला अभिमान आहे. आमच्या नेत्यानं जे मिळवलं ते स्व-कर्तृत्वानं मिळवलं. कोणाचा मुलगा म्हणून आम्हाला मिळालेलं नाही. आणि मुलगा म्हणून मिळालं असलं की मग रडायला होत, पाठीत खंजीर खुपसला, मला फसवलं, यांना खोके दिले. अरे तुम्हाला लाजा वाटायला पाहिजे, ज्यावेळेला आमचे अमित ठाकरे गंभीर आजारासोबत लढत होते, तेव्हा आमचे मनसैनिक ५-५ कोटी रुपये देऊन फोडले तेव्हा तुम्हाला लाज नाही वाटली. त्यावेळेला कुठे गेला होता तुमचा धर्म. आज तुम्ही आम्हाला सांगताय,’ असं म्हणतं संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरेंवर घणाघात केला.

तसंच पुढे देशपांडे म्हणाले की, ‘२००० सालानंतर बाळासाहेब ठाकरेंची इच्छा होती, म्हणून राज ठाकरेंनी महाबळेश्वरच्या अधिवेशनात कार्याध्यक्ष केलं. स्वतः त्यांनी प्रस्ताव दिला आणि मंजूर झाला. तुम्ही काय केलंत? कुठल्या प्रकारचं षडयंत्र राज ठाकरेंच्या विरोधात तुम्ही कायम करत आलात. आणि हे षडयंत्र करण्याची तुम्हाला गरज भासली. कारण तुमच्यामध्ये कर्तृत्व नव्हतं. त्यामुळे तुम्हाला सतत सहानभुती घ्यावी लागतं. ज्याच्याकडे कर्तृत्व आहे, त्याला सहानभुतीची गरज नाही. राज ठाकरेंकडे कर्तृत्व असल्यामुळे त्यांना सहानभुतीची गरज नाही. ५० खोके, खंजीर खुपसला बोलायची आम्हाला गरज नाही.’

(हेही वाचा – ‘त्यांना’ मुख्यमंत्री पदी बघायला आवडेल; राज ठाकरेंच्या पत्नीची सूचक प्रतिक्रिया)

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.